कोलकाता – नागरिकत्वाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते आहे. हा पक्ष केवळ आपल्या राजकीय लाभासाठी असले प्रकार करतो आहे अशा शब्दांत प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधला.
राज्याच्या २४ परगणामधील चकला येथील कार्यक्रमात बोलताना ममता म्हणाल्या, माझ्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना मी प्रत्येक गावाला भेट देण्याचे आणि लोकांशी संवाद साधण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने राज्याला मिळणारा निधी रोखून धरला आहे. तरीही राज्याच्या विकासासाठी आम्ही कठोर परिश्रम घेतो आहोत. इंडिया आघाडी संपूर्ण देशभरात भारतीय जनता पार्टीचा सामना करेल आणि प. बंगालमध्ये आघाडीचे नेतृत्व तृणमूल कॉंग्रेसकडे असेल.
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २६ डिसेंबर रोजी प. बंगालच्या दौऱ्यावर होते. यावेळी सीएए लागू करण्यास भारतीय जनता पार्टी कटीबध्द असल्याचे त्यांनी म्हटले होते. सीएए हा देशाचा कायदा आहे त्यामुळे तो लागू करण्यापासून कोणी रोखू शकत नाही असेही शहांनी म्हटले होते. ममता बॅनर्जी आणि त्यांचा पक्ष २०१९ पासून सीएएला विरोध करत आहेत. त्यामुळे भाजप आणि तृणमूल यांच्यात या विषयावरून संघर्ष विकोपाला गेला आहे.