सातारा -मराठा आरक्षणावरून जिल्ह्यात भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस एकमेकांसमोर उभे ठाकले असून या मुद्द्यावरून राजकारण रंगले आहे. खा. उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपांना आ. शशिकांत शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उत्तर दिले. त्यानंतर मराठा महासंघाचे ज्येष्ठ नेते शशिकांत पवार यांनी उदयनराजेंच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला होता.
त्याला आ. शिंदे यांनी प्रत्युत्तर देताना, उदयनराजेंचा बोलाविता धनी वेगळाच असल्याचा आरोप केला होता. त्याला आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरील याचिकाकर्ते व मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक संदीप पोळ, विवेक कुऱ्हाडे व वैभव शिंदे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस देऊन, मराठा आरक्षणाचा प्रश्न 40 वर्षे कोणी भिजत ठेवला, असा प्रतिप्रश्न केला आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, खा. उदयनराजे यांनी “बरं’ बोलण्यापेक्षा “खरं’ बोलून, स्वत:ला “स्ट्रॉंग मॅन’ समजणाऱ्यांचे पितळ उघडे पाडले. आपल्या धन्याचे पितळ उघडे पडत असल्याने, उदयनराजेंचा बोलवता धनी दुसराच आहे, अशी पळपुटी भूमिका घेण्याची आ. शशिकांत शिंदे यांच्यावर आली. सर्वसामान्य जनता आहे, म्हणून आपण आहोत, असे उदयनराजे नेहमीच सांगतात. त्यांचा धनी म्हणजे सर्वसामान्य जनता आहे.
तुमचे उघडे पडत चाललेले पितळ, सोने म्हणून दाखवत मराठा समाजाला आणखी किती दिवस भुलवणार? मंडल आयोगामध्ये मराठा समाजाचा समावेश करण्यास कुणी विरोध केला? मराठा आरक्षणाचा प्रश्न 40 वर्षे कुणी भिजत ठेवला, या प्रश्नांची उत्तरे आधी द्या. उदयनराजे यांनी पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाची वस्तुस्थिती मांडली होती. मंडल आयोगावेळी मराठा समाजावर अन्याय करण्यात आला. समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम त्यावेळच्या मराठा नेत्यांनीच केल्याचे उदयनराजेंनी म्हटले होते.
मराठा महासंघाचे संस्थापक शशिकांत पवार यांनीही उदयनराजेंच्या वक्तव्याला पुष्टी दिली. मंडल आयोगाच्या वेळी वसंतदादा पाटील यांनी सहकार्य केले तर शरद पवारांनी विरोधी भूमिका घेतल्याचे आणि मराठा आरक्षणाबाबत पवारांनी मौन पाळले होते, असे शशिकांत पवार यांनी स्पष्ट केले. त्यावरून आ. शिंदे यांनी उदयनराजे व शशिकांत पवार यांच्यावर टीका केली. उदयनराजे कसे आहेत, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. “ओठात एक आणि पोटात एक’ असे उदयनराजेंनी कधीही केलेले नाही. जे खरं आहे ते बोलणार, हे उदयनराजेंचे वैशिष्ट्य आहे.
परखडपणे बोलताना ते कोणत्याही पक्षाची चौकट मानत नाहीत, हे महाराष्ट्राने अनुभवले आहे. समाजात असलेली चीड उदयनराजेंनी व्यक्त केली. ती चीड आ. शिंदे यांच्या धन्याच्या सोयीची नाही. त्यांच्या धन्याचे पितळ उदयनराजेंनी उघडे पाडल्याने, मराठा आरक्षणातील खरा अडथळा कोणाचा आहे, हे लोकांना समजले आहे. म्हणूनच समाजाचे लक्ष विचलित करण्यासाठी आ. शिंदे हे निराधार विधाने करत आहेत. गेल्या 40 वर्षांपासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू असताना, आ. शिंदे म्हणतात की, मूक मोर्चापासून संघर्षाला सुरुवात झाली. त्यांना काहीच माहिती नाही, हे यावरून लक्षात येते. त्यांच्या धन्याने व्यक्तिगत राजकीय स्वार्थासाठी मराठा समाजाला डावलल्याचे गुपित बाहेर यायला लागल्याने, आरक्षणाचा विषय भलतीकडे नेण्याचा प्रयत्न आ. शिंदे करत आहेत; परंतु मराठा तरुण तुमच्या राजकीय चाली ओळखून आहे. तो तुम्हाला धडा शिकवेल, असा इशारा या पत्रकात देण्यात आला आहे.