Delhi capitals vs Mumbai Indians IPL 2024 Preview : आयपीएल 2024 मध्ये शनिवारी दोन सामने होणार आहेत. लीगच्या 43व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. या मोसमात ही दुसरी वेळ असेल, जेव्हा दिल्ली आणि मुंबईचे संघ आमनेसामने येतील. आतापर्यंत येथे दोन सामने झाले आहेत. ज्यामध्ये यजमान दिल्ली कॅपिटल्सने एक सामना जिंकला आहे आणि एक गमावला आहे.
आयपीएल 2024 चा 44 वा म्हणजेच शनिवारी होणार दुसरा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज (शनिवार,26 एप्रिल) संध्याकाळी 7.30 वाजता लखनौमध्ये एकना स्टेडियमवर खेळला जाईल.
दिल्ली-मुंबईसाठी महत्त्वाचा सामना….
दिल्ली कॅपिटल्सने गेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा 4 धावांनी पराभव केला होता. त्याचवेळी, मुंबई इंडियन्सला त्यांच्या शेवटच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून 9 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. दोन्ही संघांची स्थिती पाहिली तर फारसा फरक नाही. आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स 6 व्या स्थानावर आहे तर मुंबई इंडियन्स 8 व्या स्थानावर आहे. दिल्लीने आत्तापर्यंत खेळलेल्या 9 पैकी 4 सामने जिंकले आहेत आणि मुंबईने 8 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना जिंकणे आवश्यक आहे.
दिल्ली विरुद्ध मुंबई : हेड टू हेड रेकाॅर्ड..
दिल्ली आणि मुंबई यांच्यात आयपीएलमध्ये एकूण 34 सामने खेळले गेले आहेत. यापैकी मुंबईने 19 आणि दिल्लीने 15 सामने जिंकले आहेत. म्हणजे मुंबईचा वरचष्मा आहे. अशा परिस्थितीत शनिवारच्या लढतीमध्ये कोण बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दिल्ली खेळपट्टी अहवाल
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर, येथील खेळपट्टी संथ आहे, असेच काहीसे गेल्या सामन्यात पाहायला मिळाले. खेळपट्टी बरीच कोरडी आहे आणि ती फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरू शकते. वेगवान गोलंदाज सुरुवातीलाच काही प्रभाव दाखवू शकतात, त्यानंतर फिरकीपटू पूर्णपणे वर्चस्व गाजवतील. सामना दिवसाचा आहे, त्यामुळे दव पडणार नाही. सामना संध्याकाळी 6.30 ते 7 पर्यंत संपेल.
पंतची दमदार कामगिरी तर पंड्याचा संघर्ष जारी…
दिल्ली कॅपिटल्ससाठी चांगली गोष्ट म्हणजे कर्णधार ऋषभ पंत या मोसमात चमकदार कामगिरी करत आहे. या मोसमात त्याने तीन अर्धशतके झळकावली आहेत. मागील सामन्यातही त्याने नाबाद 88 धावा केल्या होत्या. त्याने एकूण 342 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, हार्दिक पंड्या संघर्ष करत आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीत तो अपयशी ठरला आहे. त्याचबरोबर पांड्याचे नेतृत्वही अपयशी ठरत आहे.
मुंबईची फलंदाजी रोहित शर्माभोवती फिरत आहे. तो संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. रोहितने 8 सामन्यात 303 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत रोहितला दिल्लीविरुद्धही खेळणे आवश्यक आहे. तर, जसप्रीत बुमराह गोलंदाजीत ट्रम्प कार्ड आहे. त्याने 13 विकेट घेतल्या आहेत. पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. दुसरीकडे दिल्लीची गोलंदाजी ही कमकुवत दुवा आहे. कुलदीप यादव (12 विकेट) वगळता कोणताही गोलंदाज आपली छाप सोडू शकला नाही.
शनिवारी दिल्लीत हवामान कसे असेल?
दिल्लीत सध्या प्रचंड उष्णता आहे. अशा स्थितीत दिवसाचा सामना खेळणे खेळाडूंसाठी सोपे जाणार नाही. असे सांगितले जात आहे की शनिवारी दिल्लीचे तापमान 40 अंशांच्या आसपास असू शकते, ज्यामुळे खेळाडूंना अडचणी निर्माण होऊ शकतात. हा सामना दुपारी 3.30 पासून खेळला जाईल, टॉस त्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच दुपारी 3 वाजता होईल. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे प्रचंड उकाडा असूनही पावसाची शक्यता नाही. त्यामुळे प्रेक्षकांना संपूर्ण सामन्याचा आनंद घेता येणार आहे.