पुण्यातील कसब्यापाठोपाठ शिवाजीनगर हा मतदारसंघ मध्यवर्ती आहे. पूर्णतः शहरी या मतदार संघात खडकी कॅन्टोमेंट बोर्डवगळता बाकी सर्व भागांचे शहरीकरण झालेले आहे. या मतदार संघाचे विभाजन होऊन स्वतंत्र कोथरुड मतदारसंघ 2009 मध्ये तयार झाला. त्यापूर्वी हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात होता. 1990 ते 2004 पर्यंतचा इतिहास पाहता, या मतदार संघात दोन टर्म शशिकांत सुतार व त्यानंतरचे दोन टर्म विनायक निम्हण निवडणूक आले आहेत. 2009 मध्ये मात्र विनायक निम्हण यांनी शिवसेना सोडली आणि त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत निवडणूक लढली आणि जिंकली. 2014 च्या निवडणुकीत मात्र गणिते चुकली आणि भाजपला यश मिळाले.
या मतदार संघात एकाच कोणत्या जातीचे प्राबल्य नाही. गेले 25 वर्षांचा येथील इतिहास पाहता, येथून भाजप आणि शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे, पण 1972 मध्ये शेतकरी कामगार पक्षाचा आमदारसुद्धा निवडून आला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत येथून भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी शिवाजीनगरमधून 77 हजार 982, तर कॉंग्रेसच्या मोहन जोशी यांना 48,450 मते मिळाली. त्याचबरोबर 13 पैकी 11 नगरसेवक हे भाजपचे आहेत. तर, खडकी कॅन्टोमेंट बोर्ड सध्या कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. त्यामुळे कॉंग्रेसची या भागात पारंपारिक मते आहेत, हे नाकारता येणार नाही.
या मतदारसंघात डेक्कन, प्रभात रस्ता, शिवाजीनगर, खडकी, गोखलेनगर, पाटील इस्टेट या भागांचा समावेश होतो. त्यातील बहुतांश भाग उच्चभ्रू सोसायट्यांच्या आहे. ठिकठिकाणी जुनी गावठाणं, तर काही ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत. भाजपमध्ये शिवाजीनगर मतदार संघातून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची गर्दी आहे. नुकत्याच इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात सर्वाधिक 31 जण याच मतदारसंघातून आहेत. कॉंग्रेसकडून सुद्धा 14 जणांनी उमेदवारी मागितली आहे. आघाडीच्या वाटपामध्ये हा मतदारसंघ कॉंग्रेसकडे आहे. त्यामुळे या मतदार संघावर कॉंग्रेसने आपला हक्क पुन्हा एकदा सांगितला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ताकद या मतदार संघात तशी ताकद कमीच आहे.
यंदा युतीच्या चर्चेमुळे हा मतदार संघ आता पुन्हा शिवसेनेला हवा आहे. सध्या येथे भाजप आमदार असल्याने हा मतदार संघ भाजप सोडायला तयार होईल, असे चित्र नाही. कारण भाजपमधील इच्छुकांची संख्या आणि लोकसभेची मते पाहता स्थानिक नेत्यांनी हा मतदार संघ शिवसेनेला सोडण्यास तीव्र विरोध केला आहे.