जागा वाटपात व्यवहार्य मागणी करण्याचा शिवसेनेला सल्ला
खासदार गिरीश बापट यांच्या वक्तव्याने चर्चा
युतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरुन शिवसेना-भाजपत सुंदोपसुंदी सुरू असतानाच खासदार गिरीश बापट यांनी “पुण्यातील आठपैकी एक जागा शिवसेनेला सोडली जाऊ शकते,’ असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे भाजपच्या कोणत्या विद्यमान आमदारावर गंडांतर येईल, याची जोरात चर्चा रंगली आहे. हे सांगतानाच “आम्हाला राजकीय मस्ती आलेली नाही. मात्र, गरज नसली तरीदेखील विधानसभेकरिता आम्ही युती करणार आहोत. त्यामुळे शिवसेनेनेदेखील जागा वाटपात व्यवहार्य पद्धतीने मागणी करावी,’ अशी अपेक्षा बापट यांनी व्यक्त केली आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित एका कार्यक्रमास बापट शुक्रवारी आले होते. यावेळी त्यांच्याशी माध्यम प्रतिनिधींनी संवाद साधला. बापट म्हणाले, “विधानसभा जागा वाटपाचा निर्णय भाजपच्या वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे. यात विद्यमान आमदारांच्या जागा त्या-त्या पक्षाला सोडल्या जातात. पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. मात्र शिवसेनेकडून पुण्यातील मतदारसंघाची मागणी झाल्यास, त्या एका जागेच्या बदल्यात मुंबईत शिवसेनेचा विद्यमान आमदार असलेली जागा भाजपसाठी सोडावी लागू शकते. शेवटी जागा वाटप करताना कोठेतरी ताळमेळ बसवावा लागतो. त्यानुसार ही अदलाबदल होऊ शकते.’
भाजपमधील इनकमिंगबाबत बापट म्हणाले, अगदी मोजक्या नेत्यांचा भाजप प्रवेश होत असताना मेगाभरतीचे चित्र दाखविले जात आहे. तसेच विरोधी पक्षाची ताकद कमी करण्याचे प्रयत्न आहेत. यामुळे भाजपच्या निष्ठावानांची नाराजी नाही, तर भाजपकडे इच्छुकांची संख्या असून, एका जागेसाठी 20 जण जण इच्छुक आहेत. तर कॉंग्रेसकडे मात्र 20 जागांसाठी एखादा-अर्धा इच्छुक आहे.