इंद्रायणीनगर -पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील बहुतांश उद्याने कोरोनाकाळात कुलूपबंद होती. परंतु करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शहरातील उद्याने खुली झाली आहेत. त्यामुळे पालक मुलांना घेऊन उद्यानांत जात आहेत. परंतु भोसरी परिसरातील नागरिक सहल केंद्रात आपल्या मुलांना घेऊन येत आहेत. परंतु महापालिकेच्या उद्यान विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे येथील सुविधा मुलांना मिळत नसल्याने पालकांसह मुलांच्या पदरी निराशा येत आहे.
दररोज उद्यानात फिरायला येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. पण, येथील अनेक सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध झाल्या नाहीत. बच्चे कंपनीसाठीची नवी कोरी आगगाडी पिंजऱ्यात शोभेची बाहुली असल्यासारखी ठेवली आहे. त्यामुळे लहान मुलांना तिचे लांबूनच दर्शन घेऊन समाधान मानावे लागत आहे. उद्यान विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. भोसरी परिसरातील सर्वात मोठे उद्यान म्हणून भोसरी सहल केंद्राचा उल्लेख केला जातो. प्रशस्त उद्यान, नागरिकांसाठी नौका विहारासाठी असलेले भव्य तळे हे येथील खास वैशिष्ट्य आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्यान बंद असल्यामुळे उद्यानाची दुरवस्था झाल्याचे चित्र पहायला मिळते. त्यामुळे अलीकडील काळात केंद्राचा नावलौकिक कमी होत – चालला आहे. कारण केंद्रात यायचे तर फक्त फेरफटका मारा व निघून जा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज दुपारी 12 ते 7.30 या वेळेत उद्यान सुरू असते. प्रौढांसाठी 10 तर लहान मुलांसाठी 5 रुपये तिकीट आकारले जाते.
स्वच्छतागृहे बंद
सहल केंद्रात फेरफटका मारल्यावर सगळीकडे हिरवळ दिसून येते. झाडांची निगा व्यवस्थित राखली जात आहे. सहल केंद्रात असलेले महिला व पुरुषांचे स्वच्छतागृह मात्र कुलूपबंद अवस्थेत असल्यामुळे पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांची विशेषतः महिलांची मोठी अडचण होत आहे. उद्यानात ठिकठिकाणी असलेल्या काही फायबर कचरा कुंड्या जीर्ण होऊन तुटलेल्या अवस्थेत स्मार्ट सिटीचे दर्शन घडवीत आहेत. या सर्व बाबींमुळे उद्यानाच्या साफसफाईत व देखरेखीकडे प्रशासनाने लक्ष देऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, अशी बोलकी प्रतिक्रिया सहल केंद्रात येणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात उद्यान उपायुक्त सुभाष इंगळे यांच्यासोबत सतत संपर्क करूनही अधिकाऱ्यांनी दाद न दिल्यामुळे प्रशासनाकडून ठोस माहिती मिळाली नाही.
विशेष आकर्षणच उरले नाही
लहान मुलांसाठी किल्ला उद्यानात असून त्यातील अनेक खेळणी तुटलेली आहेत. किल्ला कायमच बंद असतो. उद्यान सुरू झाल्यापासून आगगाडी आहे. काही वर्षांपूर्वी नवीन आगगाडी सुरू करण्यात आली. त्यासाठी लागणाऱ्या रुळाची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, कोरोनामुळे ही आगगाडी रुळावर धावू शकली नाही. परिणामी आगगडीत बिघाड झाल्याने ती रुळावरून कधी धावणार हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. बिघडलेली आगगाडी बंदिस्त होत फक्त शोभेची बाहुली झाली आहे. तळ्यातील नौकाविहारास नागरिकांचा चांगला प्रतिसाद होता. पण, तेच बंद असल्याने केंद्रात असे विशेष आकर्षण उरले नाही. तळ्याजवळील बंदराची दुरवस्था होऊन सिमेंटची पेव्हिंग ब्लॉक उखडले आहेत.
आम्ही मुलांना घेऊन सहकुटुंब सहल केंद्रात गेलो होतो. मुलांसाठी असलेली आगगाडी बंद पडलेली आहे. त्यामुळे मुलांना उद्यान विहार व खेळणे याशिवाय दुसरा विरंगुळा नाही. स्वच्छतागृह बंद असल्यामुळे अडचण झाली. उद्यानात हिरवळ मोठ्या प्रमाणावर आहे. व्यवस्था छान आहे.
– गोपाल बोचरे, भोसरी.