कामशेत -अडीच वर्षानंतर राज्यात सत्तांतर झाले. मात्र नव्याने सत्तेवर आलेल्या या सरकारने जनहिताची कामे सोडून केवळ विकास कामांचा निधी गोठविणे, सुरू असलेल्या कामांना स्थगिती देणे हेच काम सुरू केल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांनी केली.
मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकारिणी शिबिर कामशेत येथे पार पडले. या शिबीरात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, आरक्षण अभ्यासक हरी नरके, मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, इतिहास संशोधक प्रा. इंद्रजीत सावंत, शाहीर राजेंद्र कांबळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात अनेक ऐतिहासिक निर्णय झाले. त्यामध्ये ओबीसींना आरक्षण, मंडल आयोगाची अंमलबजावणी तसेच महिलांचे धोरण स्विकारले गेले ते देखील शरद पवार यांच्या कार्यकाळातच. राज्यात सत्तेत असलेले मंत्री वारंवार महापुरूषांचा अपमान करीत आहेत. त्यामुळे सुसंस्कृत महाराष्ट्र आज हरविला आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका घेतल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा प्रथम क्रमांकावर राहिल, अशी भिती विरोधकांना आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक ते या निवडणूका लांबणीवर टाकत आहेत. उद्याचा महाराष्ट्र घडविण्यासाठी तसेच 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीला सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकसंघ राहावे, असे आवाहनही तटकरे यांनी केले आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पक्षसंघटन, निवडणूक रणनीती, ओबीसी आरक्षण, महापुरुषांचा इतिहास, पोवाड्यातुन पुरोगामी विचार प्रसार, पक्षीय आढावा व मार्गदर्शन आणि मावळची राजकीय जडणघडण अशा विविध विषयांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
मावळात पहिल्यांदाच पक्षाच्या झालेल्या शिबीरामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने संघटना बांधणीवर जोर दिसून आले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मावळ तालुक्यातून सुनिल शेळके मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.