नवी दिल्ली- देशातील व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत. दीर्घ लॉकडाऊनमुळे खचून न जाता उद्योजकांनी पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागावे. आपण पुन्हा अधिक विकास दराच्या महामार्गावर निश्चित येऊ, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योजकांना दिला आहे.
भारतीय उद्योग महासंघाच्या 125 व्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना मोदी म्हणाले की, जीवित हानी टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरू करण्यात आले होते. त्यामुळे बरीच जीवितहानी टळली आहे. आता आपल्याला आर्थिक घडी पूर्वपदावर आणायची आहे. त्यासाठी सरकारने बरीच भांडवल सुलभता निर्माण करून विविध क्षेत्रात दीर्घ पल्ल्याच्या सुधारणा जारी केल्या आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की, भारतीयांची कष्ट करण्याची तयारी भारताला पुन्हा पूर्वपदावर आणेल.
अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही यासाठी आपण आत्मनिर्भर भारत अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत आर्थिक मदतीबरोबरच बऱ्याच सुधारणा जारी केल्या आहेत. भारतात तयार झालेल्या वस्तू केवळ भारतीयासाठीच नाहीतर जगासाठी उपयोगी पडाव्यात यासाठी मेड इन इंडिया मेड, फॉर द वर्ल्ड हे आपले घोषवाक्य असले पाहिजे.
देशांतर्गत अर्थव्यवस्था जागतिक दर्जाची व्हावी यासाठी भारतातील उद्योजकांनी आत्मविश्वासाने काम करण्याची गरज आहे. भारतीय जनतेमध्ये पुन्हा उठून उभा राहण्याची क्षमता आहे याचा मला पूर्ण विश्वास आहे.
त्या आधारावरच विविध क्षेत्रात आम्ही सुधारणा सुरू केल्या आहेत. भारतीय शेतकऱ्यांनी सध्याच्या परिस्थितीतही उत्तम कामगिरी करून भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविले आहे. तीच क्षमता लघुउद्योगातही आहे. मात्र या उद्योगावर लॉक डाऊनचा परिणाम झाला आहे. त्यासाठी लघुउद्योगांना केंद्र सरकार भांडवली मदत करीत आहे. लघुउद्योगांना शेअर बाजारावर नोंदणीसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत.
कशावर भर हवा
-इच्छाशक्ती
-सर्वसमावेशकता
-गुंतवणूक
-पायाभूत सुविधा
– नविन्य