प्रथा खंडित न करता अंकलीतच होणार पूजाविधी
पुणे – करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीनिमित्त माउलींच्या आणि तुकोबांच्या पादुका पंढरपूरला हवाई मार्गाने किंवा काही मानाच्या वाहनाने विशिष्ट मानकरी व्यक्तींबरोबर नेण्याचा निर्णय होत असला तरी आज (दि. 2) परंपरेनुसार अंकलीहून (बेळगाव) माउलींच्या अश्वांची विधिपूर्वक पूजा करून प्रस्थान झाले आहे. मात्र, हे प्रस्थान वेगळ्या पद्धतीने करण्यात आले आहे. आळंदीच्या आणि पंढरपूरच्या दिशेने पाच पावले चालवून अश्व पुन्हा अंकलीच्या वाड्यात आणले आहेत.
आषाढी वारीसाठी माउलींच्या आणि तुकोबांच्या पालखीच्या प्रस्थानाबाबत आळंदी अश्वांचे मानकरी शितोळे सरकार, माउलींचे चोपदार हैबतबाबांचे वंशज बाळासाहेब आरफाळकर आणि इतर यांच्याबरोबर व्हीडीओ कॉन्फरन्सीच्या माध्यमातून बैठक झाली होती. यावेळी वारी सोहळ्याची परंपरा अखंड ठेवण्यावर एकमत झाले. त्यानुसार माउली आणि तुकोबांसह इतर मानाच्या पालख्यांबाबत सरकार जो निर्णय घेईल तो मान्य करण्याबाबतही सांगण्यात आले होते. त्यानुसार परंपरा खंडित न करता ही वारी हवाई मार्गाने किंवा वाहनाने नेण्याचे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.
आषाढी एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे 13 जूनला, तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 12 जूनला प्रस्थान होणार आहे आणि ठरल्या दिवशी दोन्ही संतांच्या पादुका पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी जाणार आहेत. त्यानुसार बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पालख्यांचे प्रस्थान झाल्यावर पालख्या जागेवरच ठेवण्यात येणार असून, आषाढी एकादशीला हवाई मार्गाने अथवा वाहनाने या पादुका पंढरपूरला नेण्यात येणार आहे. परंपरा अखंड राहावी, यासाठी झालेल्या निर्णयानुसानर आज (दि. 2) अंकलीहून माउलींच्या अश्वांचे प्रस्थान झाले आहे. मात्र, अश्वांची विधिवत पूजा करून ग्रामप्रदक्षिणा करून हे अश्व पुन्हा अंकलीच्या वाड्यात आणण्यात आले आहेत.
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे बाहेर पडता येत नाही मात्र नियम म्हणून आज आम्ही पूजा करून माउलींचे अश्व आळंदीच्या व पंढरपूरच्या दिशेने पाच पावले चालवून पुन्हा वाड्यात आणले. सद्गुरू श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने अशी वेळ भविष्यात कधी येऊ नये ही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. सर्व परंपरेने चालणाऱ्या नियमांचे पालन आम्ही घरीच करणार आहोत. अंकलीच्या वाड्यात सद्गुरू श्री माउलींचे सुंदर प्राचीन मंदिर आहे. तिथेच सर्व उपचार पार पडतील. करोनाबाबतचे सर्व नियम पाळून वारीच्या बाबतीत अंकलीत राहूनच सर्व परंपरा पाळण्याचे आम्ही ठरवले आहे.
– श्रीमंत श्री ऊर्जितसिंहराजे शितोळे सरकार