मुंबई : महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस स्नेहल जगताप यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. महाडमध्ये आयोजित शिवगर्जना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटाच्या अनेक मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत स्नेहल जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला. परंतु या पक्ष प्रवेशामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीत नाराजीनाट्य सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.
स्नेहल जगताप यांच्या शिवसेना प्रवेशावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. याविषयी बोलताना त्यांनी ‘आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना सांगितलं की हे करू नका. पण तरी त्यांनी केलं. स्नेहल जगताप यांना पक्षात प्रवेश दिला. अशा प्रकारे महाविकास आघाडीतल्या पक्षाला कमजोर करण्याचं काम होत असेल तर ते चुकीचं आहे. महाविकास आघाडीची जेव्हा चर्चा होईल तेव्हा हा मुद्दा उपस्थित केला जाईल. महाडची जागा काँग्रेसची आहे आणि आम्ही ती जागा लढणार आहोत.असा निर्धार देखील यावेळी पटोले यांनी यावेळी व्यक्त केला.
खरंतर स्नेहल जगताप या गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेनेत (ठाकरे गट) जाण्यास इच्छूक होत्या. सहा महिन्यांपूर्वी जगताप यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर काँग्रेसने उद्धव ठाकरे यांना विनंती केली की, जगताप यांना पक्षात प्रवेश देऊ नये. त्यामुळे बरेच महिने हा प्रवेश रखडला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी हा पक्षप्रवेश पूर्ण झाला आणि त्यावरून आघाडीत पुन्हा बिघाडी होताना दिसून येत आहे.
खरंतर भरत गोगावले महाड मतदारसंघाचे आमदार आहेत. ते शिवसेनेचे आमदार असले तरी सध्या शिंदे गटात आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत गोगावले यांच्याविरोधात तगडा उमेदवार उभा करता यावा यासाठी उद्धव ठाकरे यांनी जगताप यांना पक्षात प्रवेश दिला आहे. मुळात काँग्रेसचे माणिकराव जगताप (स्नेहल जगताप यांचे वडील) या मतदार संघातून निवडणूक लढत होते. आता स्नेहल जगताप या इथल्या उमेदवार असतील, असेच या प्रवेशावरून स्पष्ट होत आहे.