मुंबई – ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट रिलीज होण्याआधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात चार महिलांचे मुस्लिम धर्मात परिवर्तन करून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केल्याची कथा दाखवण्यात आली आहे. 5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटावर अनेकांनी बंदी आणण्याची मागणी केली. तर काही जणांच्या हा चित्रपट पसंतीस पडला आहे. मात्र मोठा वाद निर्माण झाल्यानंतरही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने 7.5 कोटींची कमाई केली होती.
सुदीप्तो सेन दिग्दर्शित आणि विपुल शाह यांची निर्मिती असलेल्या द केरला स्टोरी या सिनेमाचे काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केले होते. नरेंद्र मोदींनी या चित्रपटावरुन कॉंग्रेसला धारेवर धरले होते. देशामध्ये जे काही घडत आहे तेच या चित्रपटामध्ये दिग्दर्शकानं दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत मोदींनी द केरळ स्टोरीचं समर्थन केलं होतं. त्यानंतर हा चित्रपट टॅक्स फ्री करावा, अशी मागणी केली गेली.
यानंतर काही राजकीय नेते ‘द केरला स्टोरी’ सारख्या सिनेमाला मोफत दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी म्हंटले आहे. याबाबत केदार शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत लिहिले की, “दुर्दैव! महाराष्ट्रात “केरला स्टोरी” या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवत आहेत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने “महाराष्ट्र शाहीर” प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दुर्दैव… महाराष्ट्रात “केरला स्टोरी” या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवतायत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने “महाराष्ट्र शाहीर” प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का? pic.twitter.com/s4cup46lns
— Kedar Shinde 🇮🇳 (@mekedarshinde) May 7, 2023
दरम्यान, 28 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र मध्यप्रदेशामध्ये ‘द केरला स्टोरी’ चित्रपट टॅक्स फ्री केल्यानंतर आता तो महाराष्ट्रातही टॅक्स फ्री करावा अशी मागणी केली जात आहे. यावर केदार शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.