नगर -करोना विषाणूच्या संकटकाळात पाण्याचे भरमसाठ दान पदरात टाकून त्या संकटकाळातही निसर्गाने कृपा केली आहे. नगर जिल्ह्यात यावर्षी पावसाने समाधानापलिकडे पाणी दिले. मात्र, त्याचा वापर काटकसरीनेच व्हायला हवा. तरच भविष्यात बरीच वर्षे पाणी टंचाईचे संकट येणार नाही, अशी भूमिका माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केली.
पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथील तलाव अनेक वर्षांत भरलेला पहायचे भाग्य या परिसरातील गावांन लाभले. त्यामुळे आज माजी मंत्री कर्डिले व जंगले शास्त्री महाराज यांच्या हस्ते तलावावर जलपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
मांजरसुंबाचे सरपंच जालिंदर कदम, पिंपळगाव माळवीचे सरपंच सुभाष झिने, डोंगरगणचे सरपंच कैलास पठारे, संतोष झिने, बाळासाहेब घोरपडे, रामदास घोरपडे, आदिनाथ पाटील मते, विजय गायकवाड, सुनील गवारे, गोरक्ष आढाव, अजय गुंड, डॉ. दिगंबर देशपांडे, जालिंदर शेळके, भगवान खैरे, यशवंत भूतकर, कचरू सोनार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी इंग्रजांनी 1920 साली पिंपळगाव माळवी तलावाची निर्मिती केली. त्या माध्यमातून शहराबरोबरच परिसरातील जेऊर, धनगरवाडी, माळी पिंपळगाव, डोंगरगण, मांजरसुंबा तसेच वडगाव या गावांचा पाणीप्रश्न देखील या तलावामुळे सुटतो. पिण्याचे पाणी व शेतीसाठी पाण्याची सोय होते. तथापि, मागील दहा वर्षांत 10 पावसाने पाठ फिरविल्याने हा परिसर कोरडा होता.