मुंबई – राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले असून अजून दोन टप्प्यातील मतदान होणे बाकी आहे. मुंबईत 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी सर्वच उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत.
त्यामुळे आता निवडणूक भरारी पथक आणि प्राप्तिकर विभाग अलर्ट मोडवर आले असून त्यांच्याकडून मुंबईत कारवाई करण्यात येत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवईमध्ये पोलिसांनी तब्बल चार कोटी 70 लाख रुपयांची रोकड जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
पवई पोलिसांनी प्राप्तिकर विभाग आणि निवडणूक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून ही कारवाई केली. दरम्यान, मुंबईतून आठवड्याभरात पाचव्यांदा रोकड जप्त करण्यात आली आहे.
याआधी सायनमध्ये 1 कोटी 87 लाख 80 हजार रुपये रोख रक्कम आणि भांडुपमध्ये 3 कोटी 93 लाख रुपयांहून अधिक रक्कम जप्त केली होती. त्याशिवाय घाटकोपर आणि दादरमध्येही अशाच प्रकारे कारवाई करण्यात आली होती.