Sanju Samson : दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals ) विरुद्धच्या सामन्यामध्ये पराभव झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) याला आणखी एक धक्का बसला आहे. त्याच्या विकेटनंतर पंचांशी वाद घालताना दिसला
संजू सॅमसन हा काल झालेल्या सामन्यात त्याच्या विकेटनंतर पंचांशी वाद घालताना दिसला आणि सर्वत्र याबदल चर्चा होत असतानाच त्याला मोठा दंडही ठोठावण्यात आला आहे. संजूला पंचांशी वाद घालणे महागात पडलं आहे. संजूला मॅच फीच्या 30 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. संजूच्या दंडाबाबत आयपीएलने अधिकृतपणे स्पष्टीकरण दिले आहे.
आयपीएलने संजूच्या दंडावर अधिकृत विधान जारी केले आहे की, “संजू सॅमसन याने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.8 अंतर्गत लेव्हल 1 चा गुन्हा केला आहे. संजूने गुन्हा कबूल केला आहे आणि यानंतर मॅच रेफरी यांनी यावर निर्णय घेतला. लेव्हल 1 उल्लंघनासाठी मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.
झेल घेण्यावरून पंचांशी झाला जोरदार वाद…
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसन 46 चेंडूत 86 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 8 चौकार आणि 6 षटकार मारले. पण 16व्या षटकात मुकेश कुमारच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या शाई होपने त्याचा झेल घेतला. शाई होपने असा झेल घेतला होता की, त्याचा पाय सीमारेषेला लागल्यासारखा वाटत होता. मात्र त्यानंतर हा झेल टिपताना होपचा पाय सीमारेषेला लागला आहे की नाही, हे तपासण्यासाठी मैदानावरील पंचांनीच तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवला. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी संजूला बाद घोषित केले. पण संजू काही मैदानाबाहेर जायला तयार नव्हता आणि बाद झाल्यानंतर तो पंचांशी वाद घालताना दिसला. त्याने बराच वेळ पंचांशी वाद घातला, पण शेवटी त्याला पंचाचा निर्णय मान्य करून पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. त्यामुळे आता बीसीसीआयने पंचांच्या निर्णयाशी असहमती दाखवल्याबद्दल संजूवर कारवाई केली आहे.
संजूच्या विकेटनंतर मॅच फिरली…
दिल्ली कॅपिटल्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 8 बाद 221 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना जोपर्यंत संजू सॅमसन मैदानावर होता तोपर्यंत राजस्थान रॉयल्स भक्कम स्थितीत होती. राजस्थानला अखेरच्या पाच षटकामध्ये 61 धावांची गरज होती. मात्र, संजू समॅसन 86 धावांवर बाद झाल्यानंतर राजस्थानचा डाव कोलमडला. राजस्थानच्या संघानं अखेरच्या पाच षटकांमध्ये पाच विकेट गमावल्या आणि त्यांना 41 धावा करता आल्या म्हणजेच 20 ओव्हरमध्ये राजस्थानच्या संघाला 8 बाद 201 धावसंख्येपर्यतच मजल मारता आली.