करोनाच्या साथीतही सत्ताधारी आणि विरोधकांचे “चांग-भलं’
पुणे – शहरावर करोनाचे एवढे दाट संकट घोंघावत आहे. रोजची बधितांची संख्या दीड-दोन हजार होत आहे. अनेकजण मृत्युमुखी पडत आहेत, असे असताना महापौर बंगल्यावर सत्ताधारी आणि विरोधक बुधवारी पार्टी झोडत होते.
मुख्यसभेत एकत्र यायचे नाही, करोनाची लागण होतेय, सदस्यांनापण लागण होत आहे. राज्य सरकारचे आदेश आहेत, अशी कारणे सांगून मुख्यसभा गेल्या चार महिन्यांपासून तहकूब केली जात आहे. त्यातून करोना आटोक्यात येत नाही हे राज्य सरकारचे अपयश आहे, वगैरे आरोप करत एकमेकांकडे बोट दाखवून विरोधाचे चित्र एकीकडे निर्माण केले जात आहे, तर दुसरीकडे मात्र एकत्र येऊन, गळ्यात गळे घालून अशा पार्ट्या होत आहेत.
सध्याच्या परिस्थितीत जम्बो कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू नाही, त्यामध्ये प्रशासन व्यग्र आहे. शहराच्या अनेक समस्या आहेत असे असताना पदाधिकाऱ्यांचे हे वागणे म्हणजे आश्चर्यकारकच आहे. एवढेच नव्हे तर ही पार्टी का आयोजित केली होती? नक्की कसले सेलिब्रेशन होते? हे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. अभय योजनेवरून दुपारी एकमेकांवर कडाडून टीका करणारे सगळेच महापौर बंगल्यावर पार्टीसाठी गळ्यात गळे टाकून एकत्र आले होते. हीदेखील आश्चर्याची बाब म्हणावी लागेल.
सध्याच्या परिस्थितीत अशाप्रकारच्या पार्ट्या करणे उचित आहे का? सध्याची परिस्थिती पार्ट्या करण्याची आहे का, या सगळ्याचे भान पदाधिकारी, नगरसेवक, गटनेत्यांनी ठेवणे आवश्यक नाही का, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.