मुंबई – भारतातीलच नव्हे तर आज जगभरातील क्रिकेट बंद आहे. गेल्या मोसमापासून भारताच्या लोकेश राहुलने आपली कामगिरी व सातत्य सिद्ध केले आहे, त्यामुळे तो येत्या काळात कसोटी संघात निश्चितच स्थान मिळवेल असा विश्वास भारताचा माजी कसोटीपटू वसिम जाफर याने व्यक्त केला आहे.
करोना विषाणूच्या धोक्यामुळे आज भारतीय संघच नाही तर जगातील कोणताही संघ क्रिकेट खेळत नाही. हा धोका जेव्हा संपूष्टात येईल तेव्हाच परिस्थितीचा अंदाज घेऊन पुन्हा एकदा क्रिकेट सुरु होईल. त्यावेळी भारतीय संघ पुढील काळात जेव्हा कसोटी मालिका खेळेल त्यावेळी त्या संघात लोकेश राहुल निश्चितच स्थान मिळवेल, असेही जाफरने स्पष्ट केले.
खरे सांगायचे तर आता या घडीला सामने तसेच खेळाडू यांच्याबाबत बोलणे अनेकांना पसंत पडणार नाही. मात्र, भारताच्या कसोटी संघाबाबत बोलायचे झाले तर इतके तरी मी सांगू शकतो की ज्यावेळी कसोटी मालिका जाहीर होईल त्यावेळी निवड समिती राहुलला बाजुला ठेवूच शकत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भरात असलेल्या राहुला संधी न दिल्याने भारतीय संघाचेच नुकसान झाले हे प्रत्येकजण मान्य करेल, असेही जाफर म्हणाला.