थिरूवनंतपुरम – लॉकडाऊनच्या काळात दारूच्या व्यसनी लोकांना दारू मिळेनाशी झाल्याने काही जणांनी आत्महत्या केल्याचा प्रकार घडल्यानंतर केरळ सरकारने काल रात्री अशा लोकांना डॉक्टरांच्या चिठ्ठीवर दारू देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. दारूचे व्यसन असलेल्या लोकांना दारू मिळेनाशी झाली की त्यांची अस्वस्थता आणि मानसिक स्वास्थ्य बिघडते काहींमध्ये आत्महत्येची प्रवृत्तीही बळावते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे, असे सरकारी आदेशात म्हटले आहे.
मात्र डॉक्टरांची चिठ्ठी असली तरी मर्यादित प्रमाणातच त्यांना दारूचा पुरवठा केला जाईल असे त्यांनी म्हटले आहे. अशा लोकांनी सार्वजनिक आरोग्य केंद्रे, तालुका हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालये किंवा जनरल हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वताची तपासणी करून घेऊन मगच डॉक्टरांची चिठ्ठी घ्यावी. डॉक्टरांनीही संबंधित रुग्णाला तशी गरजच असेल तरच ही चिठ्ठी द्यावी असेही सरकारने कळवले आहे.
दरम्यान इंडियन मेडीकल असोशिएशनने सरकारच्या या निर्णयावर टीका केली असून सरकारचा हा निर्णय अशास्त्रीय आहे असे त्यांनी म्हटले आहे.दारू मिळत नसल्याने केरळात आत्तापर्यंत तीन लोकांनी आत्महत्या केली आहे.