मुंबई – भारतासाठी आगामी टी-20 विश्वकरंडक जिंकायचाय असा निर्धार सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा याने व्यक्त केला आहे. ही स्पर्धा येत्या ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणार आहे.
करोनाचा धोका वाढल्याने ऑस्ट्रेलियात सप्टेंबर अखेरपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यानंतर देखील ही स्पर्धा होणार का असा संभ्रमही निर्माण झाला आहे. जर करोनाचा नायनाट झाला व ही स्पर्धा झाली तर गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेतील अपयश या टी-20 विश्वकरंडकात पुसून काढत विजेतेपद देशाला मिळवून देण्याचा निग्रह रोहितने व्यक्त केला आहे.
टी-20 विश्वकरंडक स्पर्धा संपूर्ण भारतीय संघासाठी अत्यंत महत्वाची आहे. गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत उपांत्य लढतीत आम्हाला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी ही स्पर्धा जिंकणे शक्य होते मात्र, त्यावेळी महत्वाच्या क्षणी आमच्याकडून चांगली कामगिरी झाली नाही व विजेतेपद गमवावे लागले होते. यावेळी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत मात्र कठोर मेहनत घेत विजेतेपद संघासाठीच नव्हे तर देशासाठी जिंकायची इच्छा आहे. त्यासाठी करोनाचा धोका संपुष्टात आल्यानंतर सराव सुरु होईल व त्यातून विजेतेपदासाठी आम्ही सज्ज असू, असेही रोहितने व्यक्त केले.
नव्या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडचा दौरा केला. त्यात एकदिवसीय व टी-20 मालिकेत आम्ही यजमान संघाला व्हाइटवॉश दिला मात्र, कसोटीत आमचा खेळ दर्जाला साजेसा झाला नाही व आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला होता. ते अपयश आजही सलत आहे. त्याची भरपाई केवळ टी-20 विजेपदानेच होईल. सध्या करोनामुळे सर्वच स्पर्धा स्थगित झाल्या आहेत, त्यामुळे कधी एकदा स्पर्धा घोषित होतील व त्यासाठी सराव सत्र सुरु होईल याकडेच आमचे लक्ष लागले आहे.
स्वप्नपूर्ती होणार…..
भारतीय संघाला पुन्हा एकदा टी-20 विश्वकरंडक जिंकून देण्याचे माझे स्वप्न आहे. 2007 नंतर पुन्हा एकदा विजेतेपदाचा करंडक भारतात आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेण्याचीही आमची तयारी आहे. यंदा स्पर्धा झाली तर विश्वकरंडक विजयाचे आमचे स्वप्न आम्ही निश्चितच पूर्ण करु असा विश्वासही रोहितने व्यक्त केला.