नवी दिल्ली – भारतात पसरत असलेला करोना विषाणूमध्ये गेल्या दोन महिन्यांत बदल झालेला आहे का याचा अभ्यास करण्याची तयारी “इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ अर्थात “आयसीएमआर’कडून केली जात आहे. जर या विषाणूमध्ये काही स्थित्यंतर घडून आली असतील, तर त्यावर उपचारासाठीच्या संभाव्य औषध परिणामकारक ठरण्यास मदतच होईल, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. जर या विषाणूमध्ये काही परिवर्तन झाले असेल, तर त्याचे बदललेले स्वरूप अधिक विषाक्त आणि अधिक घातक आहे का, याचाही अभ्यास संशोधक करायला लागले आहेत.
हा अभ्यास करण्यासाठी करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांकडून नमुने गोळा केले जाणार आहेत. मात्र सध्या या नमुन्यांची एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहतुक करणे अवघड असल्यामुळे एकदा लॉकडाऊन उघडल्यानंतरच हा अभ्यास सुरू केला जाऊ शकणार आहे.
इन्फ्लूएंझाशी संबंधित संशोधनाबाबतचा सर्व डाटा जगभर शेअर केला जातो. त्या डाटानुसार भारतात फैलाव होत असलेल्या करोना विषाणूच्या स्वरूपात आणि अन्य देशांमध्ये सापडलेल्या विषाणूच्या स्वरुपात 0.2 ते 0.9 टक्क्यांचा फरक आढळला आहे, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
जगभर शेअर केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या इन्फ्लूएंझाबाबतचा क्लिनिकल डाटामध्ये “सार्स-कोव्ह2′ विषाणूच्या जगभरातल्या प्रयोगशाळांमध्ये जमा केलेले 7 हजार जनुकीय संरचनांचे नमुने आहेत. त्यात विषाणूच्या बदलत गेलेल्या स्वरुपानुसार वर्गीकरणही केलेले आहे. भारतात येणाऱ्या लोकांबरोबर विषाणूचे प्रत्येक ठिकाणचे बदललेले स्वरूपही भारतात आणले गेले असल्याची शक्यता आहे. आतापर्यंत भारतात तीन स्वरूपाचे विषाणू आढळून आलेले आहेत.
त्यातील एक वुहानमधील, एक इटलीमधील आणि एक इराणमधील आहे. इराणमधील करोना विषाणूच्या जनुकीय संरचनेचे स्वरुप चीनच्या विषाणूप्रमाणेच होती. या विषाणूचे मूळ स्वरूप समजून घेण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लगेल. मात्र त्यात बदल झालेल्या विषाणूवर औषधे परिणामशून्य ठरणार नाहीत. या विषाणूच्या सर्व उपप्रकारांमध्ये एकसारखीच द्रव्ये असतात. तसेच भारतात हा विषाणू केवळ तीन महिन्यांपासूनच आहे. इतक्यात त्यात फेरबदल होत नाहीत, असे “आयसीएमआर’च्या साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले आहे.