Rohit Sharma, Ajit Agarkar Press Conference Live Updates : टी-20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे, ज्यामध्ये केएल राहुलची निवड न होणे चर्चेचा विषय बनले होते. बीसीसीआयने विश्वचषक संघात ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांची यष्टिरक्षक फलंदाज म्हणून निवड केली आहे. याशिवाय 15 खेळाडूंमध्ये रिंकू सिंगची निवड न झाल्याने सोशल मीडियावर चाहत्यांनी बीसीसीआयवर टीका करण्यास सुरुवात केली होती.
केएल राहुलने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 10 सामन्यांमध्ये 40 पेक्षा जास्त सरासरीने 406 धावा केल्या आहेत. तर रिंकू सिंगने गेल्या वर्षी पदार्पण केल्यानंतर भारतीय संघासाठी 89 च्या सरासरीने फलंदाजी केली आहे. आता पत्रकार परिषदेत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी राहुल आणि रिंकूची निवड न करण्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
केएल राहुलची निवड का झाली नाही?
केएल राहुलची निवड न झाल्याबद्दल मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले, “केएल राहुल हा उत्कृष्ट फलंदाज आहे, परंतु आम्हाला मधल्या षटकांमध्ये फलंदाजी करू शकेल अशा फलंदाजाची गरज होती. राहुल सध्या आयपीएलमध्ये त्याच्या संघासाठी सलामी देत आहे तर ऋषभ पंत आणि संजू सॅमसन डावाच्या उत्तरार्धात फलंदाजीची जबाबदारी सांभाळू शकतात. संघात फलंदाजीचे कोणते स्लॉट रिक्त होते त्याच आधारावर हा निर्णय घेण्यात आला आहे. ”
🎙️The press conference commences at the BCCI HQ 📍#TeamIndia Captain Rohit Sharma and Mr. Ajit Agarkar, Chairman of Men’s Selection Committee are here 🙌#T20WorldCup | @ImRo45 pic.twitter.com/jwGOuCdgi1
— BCCI (@BCCI) May 2, 2024
रिंकू सिंगबाबतही दिलं स्पष्टीकरण…
रिंकू सिंग याच्याबाबत आगरकर म्हणाले, “आम्हाला रिंकू सिंगबद्दल खूप विचार करावा लागला आणि कदाचित आमच्यासाठी हा खूप कठीण निर्णय होता. त्याने काहीही चुकीचे केलेले नाही आणि शुभमन गिलनेही काही चुकीचे केलेले नाही. हे सर्व संयोजनावर (
combination) अवलंबून आहे. आता आमच्याकडे 2 रिस्ट (मनगटी) फिरकी गोलंदाज आहेत, त्यामुळे रोहितकडे आणखी पर्याय असतील. याला दुर्दैव म्हणता येईल. रिंकूला राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे, यावरून तो 15 खेळाडूंच्या संघात स्थान मिळवण्याच्या अगदी जवळ असल्याचे दिसून येते. शेवटी आम्ही फक्त 15 खेळाडू निवडू शकतो.”
दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीची मंगळवारी बैठक झाली. त्यानंतर 2024 च्या T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ घोषित केला गेला. टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. तर सध्याच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याला टी-20 विश्वचषकासाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
T20 विश्वचषक 2024 साठी भारतीय क्रिकेट संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल. अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज राखीव खेळाडू – शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान