वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील 19 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व 10 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी रविवारी (दि. 5) मतदान होणार आहे. मात्र 19 ग्रामपंचायतीच्या निवडणुकींपैकी चार बिनविरोध झाल्याने 15 ठिकाणी मतदान होणार आहे. तर 10 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीपैकी पाच बिनविरोध झाल्याने एकूण 20 ठिकाणीच प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या 20 ग्रामपंचातीच्या निवडणुकीसाठी एकूण 55 मतदान केंद्र असणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 6 ऑक्टोबर रोजी मावळ तहसीलदार यांनी निवडणुकीबाबत अधिसूचना जारी केली. यापैकी सार्वत्रिक निवडणुका असलेल्या 19 ग्रामपंचायतीपैकी 4 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने व पोटनिवडणुका असलेल्या 10 ग्रामपंचायतींपैकी 5 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने रविवारी एकूण 20 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
या 20 ग्रामपंचायतींसाठी एकूण 55 मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर निवडणूक आयोगाकडून 6 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. यासाठी कृषिविभाग, महसूल विभाग, पंचायत समिती इत्यादी विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे.
रविवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी शनिवारी (दि. 4) वडगाव येथील भेगडे लॉन्स येथून प्रांत अधिकारी सुरेन्द्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख, अप्पर तहसीलदार अजित दिवटे, नायब तहसीलदार गणेश तळेकर, मंडल अधिकारी रमेश कदम यांच्या उपस्थितीत दुपारी मतपेट्यांचे वितरण करण्यात आले.
प्रतिस्पर्ध्यांवर नजर
निवडणुकीच्या अगोदरची रात्र “कतल की रात’ म्हणून ओळखली जाते. पैसे वाटताना आपला कार्यकर्ता पकडला जाऊ नये, तसेच प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटता येऊ नये म्हणून दोन्हीकडील कार्यकर्ते सक्रिय असतात.
मताला आला भाव
सरपंचाची निवड थेट जनतेमधून होणार असल्याने बहुतांश गावात ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये देखील मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे एका मताला दोन हजारांपासून ते अगदी दहा हजार रुपयांचा भाव भुटल्याची सर्वत्र चर्चा आहे.
पैसे दोन्हीकडून, मत मात्र आवडत्या उमेदवारालाच
बहुतांशी ग्रामपंचायतीमध्ये दोन्ही बाजूंकडून पैसे मतदार घेतात. एवढेच नव्हे तर एका उमेदवाराचे जरी पैसे आले नाहीत तर निवडणुकीच्या दिवशी सायंकाळ पर्यंत मतदानाला बाहेर पडत नाहीत. दोन्ही बाजूंनी पैसे घेऊन मत मात्र आपल्या आवडत्या उमेदवारालाच देतात.