किवळे, (वार्ताहर) – लोकशाहीच्या या उत्सवात जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी व्हावे यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. मात्र दुसरीकडे काही शासकीय अधिकाऱ्यांच्या अक्षम्य चुकांमुळे देहूरोड परिसरात मतदानावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २५ एप्रिलला प्रसिद्ध झालेल्या देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील अंतिम मतदार यादीत भरमसाट चुका दिसून आल्या आहेत.
प्रामुख्याने चिंचोलीतील काही मतदारांची नावे अद्यापही सहा किलोमीटर अंतरावरील निगडीतील अप्पुघर परिसरातील यादीत आहेत. तर देहूरोड येथील काही भागातील मतदारांची नावे चिंचोलीतील मतदारयादीत समाविष्ट केल्याचे दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने २३ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या मतदारयादीत चिंचोलीतील ३८१ मतदारांची नावे सहा किमी अंतरावरील अप्पुघर, निगडी येथील दत्तनगर, श्रीविहार भागातील मतदार यादीत समाविष्ट होती.
याबाबत तक्रारी आल्यानंतर २५० हून अधिक जणांची नावे पुन्हा चिंचोलीतील मतदार यादीत समाविष्ट केल्याचे अंतिम मतदारयादीत पाहायला मिळाले. मात्र ज्यांना आपली नावे इतरत्र आल्याचे माहितीच नाही त्यांची नावे अद्यापही जुन्याच यादी प्रमाणे आहेत. त्यामुळे या मतदारांना मतदानासाठी निगडीपर्यंतचा सहा किलोमीटरचा प्रवास स्वखर्चाने करावा लागणार आहे.
अंतिम मतदार यादी पाहिली असता देहूरोड बाजारपेठ, शिवाजीनगर, मरीमाता मंदिर, कुंचीकर वस्ती, दत्तमंदिर, अमृता फार्म, आंबेडकर नगर, थॉमस कॉलनी, शितळानगर, गांधीनगर येथील अनेक मतदारांची नावे नव्याने चिंचोली गावातील अनुक्रमे केंद्र क्रमांक ३२६, ३२७, ३२८, ३२९ या चार मतदान केंद्रांच्या मतदारयादीत समाविष्ट केल्याचे दिसत आहे.
त्यामुळे देहूरोड परिसरातील या मतदारांना केंद्राची शोधाशोध करून चिंचोली भागात सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतरावर जाऊन मतदान करावे लागणार आहे. तर, निगडीतील सिद्धिविनायक नगरी भागातील मतदान केंद्रावर चिंचोलीसह देहूरोड बाजार, शिवाजीनगर,
साई द्वारका सोसायटी येथील मतदारांची नावेही दिसत आहेत. या केंद्रात नाव असल्याची माहिती उपलब्ध न झाल्यास तसेच मतदार मतदानाला न गेल्यास, किंवा जाण्याचा कंटाळा केल्यास मतदानाची टक्केवारी आपोआप घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मतदार महत्त्वाचा आहे की नाही?
लोकशाहीच्या या सर्वांत मोठ्या उत्सवाकरिता एक एक मतदार महत्त्वाचा असताना देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील मतदार यादीत चुका झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आयोगाला मतदार महत्त्वाचा आहे की नाही असा प्रश्न मतदार विचारत आहेत.
या चुकांकडे आयोगाचे दुर्लक्ष
– गेल्या १० ते १५ वर्षांपासून स्थलांतरित मतदारांची नावे मतदार यादीत.
– मृत मतदारांची नावेही नव्याने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत समाविष्ट.
– एकाच घरातील नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर.
– पतीचे नाव एका मतदान केंद्रात तर पत्नीचे नाव दुसऱ्या मतदान केंद्रात.