एक भगिनी डोक्यावर गाठोड्यात बाजारहाट घेऊन जात होती. तिच्याकडे बघून मला लहानपणी केलेल्या बाजाराची आठवण आली. ग्रामीण भागातील आठवडा बाजाराची रीत आणि पद्धत काही वेगळीच असते. पूर्वीच्या काळी बाजाराचे चित्र असेच होते. आठवड्यातील बाजारातून आणलेले धान्य, भाजीपाला, खाद्यपदार्थ एकाच धोतराच्या किंवा फडक्याच्या एका कोपऱ्यात बांधून म्हणजेच त्याचे छोटे बोचके बांधून स्वतंत्र गाठोडं केलं जायचं. त्याकाळी हातपिशव्या उपलब्ध नव्हत्या आणि असल्या तरी सामान्य लोकांना विकत घेणे व्यावहारिक वाटत नव्हते.
ग्राम व्यवस्था स्थापित होताना मनुष्याच्या मूलभूत गरजा गावातील पंचक्रोशीत पूर्ण व्हाव्यात, यासाठी वस्तूची खरेदी विक्री करण्याचा दिवस म्हणजे बाजार. काही व्यवहार मात्र वस्तू विनिमयाद्वारे त्याकाळी होत असत, पण पुढे माणसाच्या गरजेनुसार, त्याचबरोबर भौतिक सुविधा आणि विकसित विज्ञान, तंत्रज्ञान याच्या प्रगतीमुळे पैशाची निकड भासत गेली. त्याचबरोबर पैशाची उपलब्धी आणि वापरही वाढत गेला. मानवी जीवनात पैसा हाच एकमेव घटक होऊन बसला. गरजेच्या अनुषंगाने बाजार ही संकल्पना भारतीय उपखंडामध्ये स्थापित होत गेली. खेडेगाव, वस्ती, वाड्या मिळून एखाद्या मोठ्या गावात आठवडी बाजार स्थापित व्हायचा. त्याला कोणी मंडीही म्हणायचं.
यात “विनिमय’ हा कधी वस्तू माध्यमातून तर कधी पैसा माध्यमातून होत गेला.
आठवडी बाजार ठरलेल्या दिवशी भरत असे. बाजारात अन्नधान्य, स्थानिक कारागिराने बनवलेल्या वस्तू, कपडेलत्ते, झाडपाल्याची औषधे, लहान मुलांची खेळणी, मसाले अशा अनेक वस्तू त्यावेळी बाजारात उपलब्ध असायच्या. त्याचबरोबर काही करमणुकीचे कार्यक्रमसुद्धा बाजाराच्या दिवशी पार पाडले जायचे. विशेष करून कला सादरीकरणही, त्यादिवशी सादर केले जायचे. गावातील मजुरांचे पगार किंवा पैशाचे इतर सौदे, व्यवहार, बैठका व अनेक देवाण-घेवाण यासाठीसुद्धा बाजाराचा दिवस शुभमुहूर्त म्हणून साधला जायचा. त्यामुळे आर्थिक उलाढालीचे केंद्र असणाऱ्या बाजार दिवसाची लोक आतुरतेने वाट पाहात असत. अनेक प्रेमिकांची पसंतीसुद्धा बाजारातच नजरेला नजर लावून होत असे, या अनुषंगाने मराठीत अनेक गीते आहेत, जसे की,
भरल्या “बाजारी’ धनी मला तुम्ही हेरलं!
हेरलं ते हेरलं
लगीन अपुलं ठरलं!
कुठं कुठं जायचं हनिमूनला!!
अलीकडे लावणीतही बाजार शब्दाची छाप आहे-
असं काय करता दाजी हिला भेटा की येत्या “बाजारी’।
मला जाऊद्याना घरी आता वाजले की बारा।
परंपरा- चालीरीती- रुढी- मूल्य टिकून ठेवण्याची क्षमता समाजात असते.
आठवडी बाजार म्हणजे त्या भागातील आर्थिक जीवनाचे प्रतिबिंब असे. खेडेगावातील वस्तू, सेवा यांच्या व्यवहारास बाजारातून चालना मिळत असे. एकंदरीत त्या परिसरात आर्थिक स्थिती व अर्थगाडा बाजाराच्या भव्यतेनुसार ठरला जायचा. दुकाने ही एका दिवसासाठीच असायचे आणि त्यासाठी काही पक्की जागा अथवा बांधकाम नसायचे. सार्वजनिक ठिकाणी पाणी व स्वच्छता, त्याचबरोबर इतर सुविधा ग्रामपंचायत पुरवत असे. यामुळे दुकानदारांचा खर्चही आटोक्यात राहून त्यांना अगदी माफक नफ्यामध्ये माल ग्राहकाला विक्री करायला जमत असे. विशेषतः व्यापारीसुद्धा सेवार्थ भाव म्हणून बाजारातील दुकानदारी करत असत. लहानपणी उत्सुकता असायची ती बाजाराची. विशेष म्हणजे बाजारामध्ये त्यावेळेस खाऊ किंवा गोडधोड वस्तू मिळत असत. लहान मुले हट्टाने वडीलधाऱ्याकडे बाजाराच्या दिवसाची विचारणी करायचे. मग ती मंडळी तुला कपडे, खेळणी, शालेय वस्तू, गोडधोड खाऊ घेऊन येईन, असे आश्वासन देऊन टाकायचे.
बाजारांमधला खाऊ, भत्ता उघड्यावर पण तोही ताज्या हवेत बनवला जात होता. त्यामुळे जिलेबी, रेवडी, गोडी शेव याची चव काही वेगळीच होती. आयुष्यात भरपूर ठिकाणी जेवलो पण त्या बाजारातल्या मिठाईची चव जगात कुठेही मला मिळाली नाही. उत्पादकाची प्रामाणिक कृती, सामाजिक बांधीलकी आणि स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी करण्यात येणारा व्यवसाय व त्यातून मिळणारी अत्यल्प कमाई यामध्ये दुकानदार समाधानी असायचे आणि ग्राहकही माफक किमतीत वस्तू मिळत असल्यामुळे निश्चितच सुखी राहायचे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बंदरे व आरमार बांधली गेली आणि भारतात आंतरराष्ट्रीय व्यापाराची एक आदर्श साखळी तयार झाली. शिवकालीन पर्वामध्ये रायगड किल्ल्यावर आदर्श बाजार तळ बांधण्यात आला आणि त्यासाठी योग्य सुविधा दिल्या गेल्याने ते व्यापाऱ्याचे मोठे केंद्र स्थापित झाले. बाजार करताना ग्राहक त्याचबरोबर सैनिक घोड्यावर बसून बाजार करत असत.
अशी त्या दगडरुपी कथड्याची उंच बांधकाम रचना करून एक आदर्श बाजारपेठ रायगडावर स्थापित केला. लढाईच्या युगात अनेक व्यापारी, दुकानदार सैन्याबरोबर जायचे. त्यामुळे सैन्यांने त्यांच्या मालाद्वारे स्वतःची गरज भागवायची अशी प्रथा होती, पण ते व्यापारी प्रत्यक्षात लढाईत कधीच उतरत नसत. निकामी, नुसतेच बाजारपेठेत फिरणारे अर्थात कर्तव्य शून्य माणसाला “बाजार बुणगे’ म्हणायची प्रथा रुजू झाली. सदा पैसा आणि व्यवहार यास प्राधान्य देणाऱ्या माणसाला “बाजारीमाणूस’ असाही शब्द रुजू होत गेला. भारत हा खेड्यांचा तसेच कृषीप्रधान देश असल्यामुळे कृषी बाजारपेठ स्थापित झाली. ग्रामीण भागामध्ये जमीन करण्यासाठी हवे ते पशुधन आठवडी बाजारात उपलब्ध व्हायचे. त्याचबरोबर घोडे, म्हैस, बैल शेळी, मेंढी, गाढव याचेही बाजार भरू लागले. काही बाजार तर सर्वत्र प्रसिद्ध होऊ लागले. सोनपूर बिहारमध्ये जगातील सर्वात मोठा गुरांचा बाजार भरतो. तर मढीच्या यात्रेत भटके विमुक्त जमाती त्याचबरोबर फिरस्ती जमाती, गरीब लोक राज्यभरातून तेथे येतात.
त्याकाळी दळणवळणाचे साधन म्हणून गाढवाचा मोठ्या प्रमाणात उपयोग व्हायचा. कारण त्यांना बैल, घोडे हे परवडणारे नव्हते. आणि वजन व वाहतूक या दृष्टिकोनातून गाढवाला त्यांची पसंती असे. तसेच भ्रमंतीसाठी सुद्धा त्याचा उपयोग होत असे. त्यामुळे मढीच्या जत्रेच्या दिवशी ते गाढवावर येत असे. पुढे अशी प्रथा पडत गेली की… तेथे जत्रेच्या दिवशी गाढव बाजार भरू लागला आणि हा बाजार भारतभर प्रसिद्ध होत गेला. अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव येथे म्हशीचा व्यापार प्रसिद्ध आहे. तर सारंखेडा या घोडेबाजारातून पाकिस्तान बलुचिस्तान त्याचबरोबर देशातील वेगवेगळ्या राज्यातून घोडे दाखल होतात. आणि हाही बाजार सर्वश्रुत आहे.
आता तर ग्रामीण भागापर्यंत जागतिकीकरणाचे वारे घुसल्याने आठवडा बाजाराचे स्वरूप बदलले आहे. बाहेरच्या देशातून आयात केलेल्या वस्तू ही बाजारात मिळू लागल्या आहेत. गुणवत्ता, प्रत याचा पूर्णपणे बोजवारा उडत गेला. मोठी किराणे दुकाने, डिपार्टमेंटल स्टोअर, शॉपिंग मॉल, शोरूम, मोठ-मोठी प्रदर्शन स्थळे यामुळे जगभर मोठ्या भांडवल दारांच्या हाती भारतीय आठवडा बाजार पूर्णपणे गेलेला दिसून येतो. म्हणजेच मोठ्या उद्योगपतीने बनवलेल्या वस्तू सुद्धा आठवडा बाजारामध्ये सध्या विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत. भारतीय बाजार ही फक्त गरिबासाठीच एक जीवन जननी म्हणून आता होती. पण जागतिकीकरणाबरोबरच सुधारित फालतू नकली उत्पादने ग्रामीण भागापर्यंत येऊ लागली आहे. यामुळे संस्कृतीबरोबरच बाजारासारख्या व्यवस्थाही अलगत श्रीमंत, व्यापारी साखळी झाल्या आहेत.
– डॉ. डी. एस. काटे