वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका व 10 ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मात्र उमेदवार गावात कमी आणि वडगावात जास्त पाहायला मिळत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवार (दि. 16) ते शुक्रवारी (दि. 20) ही मुदत होती. मात्र ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे पोर्टल अतिशय धीम्या गतीने चालत असल्याने बहुतांशी उमेदवार हे आपले उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वडगावातच दिवसभर थांबून होते.
राज्यभरात ग्रामपंचायत निवडणूकीचा बिगुल वाजल्याने गावागावातील कार्यकर्ते कामाला लागले आहेत. कार्यक्रमानुसार सार्वत्रिक निवडणुका या संगणकीय प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी सोमवार (दि. 16) ते शुक्रवार (दि. 20) या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली होती. मात्र ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्र भरताना अनेक अडचणी येत असल्याने अर्ज भरण्यास खूप वेळ लागत होता. यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून ही वेळ वाढवून सायंकाळी साडेपाच पर्यंत करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचा ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट असल्याने तसेच आपला उमेदवारी अर्ज बिनचूक असावा यासाठी सर्वच उमेदवार वडगावातील ठराविक लोकांकडूनच उमेदवारी अर्ज भरून घेताना दिसून आले. उमेदवारी अर्ज भरणाऱ्या लोकांच्या दुकानांमध्ये देखील मोठी गर्दी झाली होती. राज्य निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर सबमिट होण्यास खूप वेळ लागत होता. त्यात इतर प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे जमविण्यात उमेदवारांची दमछाक झालेली पाहायला मिळाली. यामुळे एकंदरीतच 19 गावचे सर्व उमेदवार सोमवार पासून वडगावातच पाहायला मिळत होते. अनेकांनी तर आपल्या कार्यकर्त्याना वडगावातच बोलावून येथेच बैठका घेतल्या.
उमेदवारी अर्ज रात्री उशिरापर्यंत थांबून भरावे लागत असल्याने उमेदवाराना रात्री उशिरा गावात जाऊन बैठका घेणे देखील शक्य होत नव्हते. त्यामुळे निवडणुका असलेली गावे ओस पडलेली पाहायला मिळाली. ज्या 10 गावांची पोटनिवडणूक आहे त्या उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरायचे असल्याने ते निश्चिंत असल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने वडगावात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
चूक एकाची टेन्शनमध्ये इतर उमेदवार
अर्ज भरताना गोंधळ होत होता. एखाद्याने अर्ज चुकविला की पुन्हा सर्व उमेदवार आपले अर्ज देखील तपासून पाहताना दिसले. त्यामुळे चूक एकाची अन् मनस्ताप सर्वांना असे चित्र वडगावमध्ये पहायला मिळाले.