पुणे – “फणी’ चक्रीवादळ बांगलादेशकडे वळाल्यानंतर मागील 48 तासात राज्यातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढत्या तापमानामुळे दि. 8 आणि 9 मे रोजी कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, राज्यात आज सर्वाधिक ब्रह्मपुरी येथे 45.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
राज्यातील हवामानात सतत बदल होत असल्यामुळे दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री गारवा अशा अनुभव सध्या नागरिक घेत आहेत. कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान कमी होत आहे तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यातील उष्णतेची लाट कमी होत नाही. पुढील दोन दिवसात (दि. 7 आणि 8) विदर्भातील तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर दि. 9 मे रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस पडेल, अशी शक्यताही वर्तविली असून, ह्या पावसाने तरी तापलेला विदर्भ शांत होईल का? कारण, उन्हाच्या वाढत्या चटक्यामुळे उष्णाघाताचा धोका आणखीन वाढला आहे.