पुणे – शहरातील पाणीपुरवठा सुरळीत झाला असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत असला, तरी शहरातील टँकरच्या फेऱ्या कमी होण्यास तयार नाहीत. शहरात १ एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत तब्बल २९ हजार टँकरच्या फेऱ्या झाल्या आहेत.
विशेषत: उपनगरांमध्ये मोठ्या सोसायट्या आणि नव्याने समाविष्ट गावांमधील सोसायट्यांमध्ये ही पाण्याची समस्या असल्याचे समोर आले आहे, तर या फेऱ्यांमध्ये खासगी टँकरची संख्याच अधिक असल्याने सोसायट्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
शहरातील तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर गेला आहे. त्यामुळे वाढत्या उकाड्याने शहरातील पाण्याची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली असून, महावितरणच्या वीज बिघाडामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम होत आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे.
त्यातच लोकसभा निवडणुका असल्याने महापालिकेवर पाण्यासाठी चांगलाच राजकीय दबाव असून, महापालिकाही वाढत्या पाण्याच्या मागणीपुढे हतबल झाली आहे. शहरात कमी- अधिक प्रमाणात पाणी दिले जात आहे. मात्र, त्यानंतरही अनेक भागात पाणीच जात नसल्याने, तसेच महापालिकेकडे तक्रारी करूनही काहीच होत नसल्याने नागरिकही त्रस्त झाले असून, पाण्यासाठी मोठ्या सोसायट्यांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे.
नगरसेवकही मदतीला येईनात..
गेल्या दोन वर्षांपासून शहरात महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. परिणामी शहरात प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त कामकाज पाहतात, तर या निवडणुका भविष्यात कधी होतील, याचा कोणताही अंदाज नाही. त्यामुळे शहरात नगरसेवकच नसल्याने नागरिकांची कोंडी झाली आहे.
नागरिक पाण्यासाठी माजी नगरसेवकांकडे गेल्यास ते पाणीपुरवठा विभागात फोन करतात. मात्र, आमच्या हातात काहीच नाही, असे सांगत नागरिकांना माघारी पाठवून देत आहेत. अधिकारी ऐकत नाहीत, नगसेवक नसल्याने अधिकाऱ्यांना बोलू शकत नसल्याचे सांगत नागरिकांची बोळवण केली जात आहे.
टँकर मिळतो मग पालिका का देत नाही?
पाणी मिळत नसल्याने सोसाट्यांकडून महापालिकेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. खासगी टँकरला आम्ही पैसे मोजतो. हा टँकर महापालिकेच्या जलकेंद्रातूनच आणला जातो, तर शहरात जिथे कमी पडते तिथे टँकरने पाणी दिले जाते. मग पाणी महापालिकेचेच असेल, तर त्यांनीच ते द्यावे आमच्यावर त्रयस्थाकडून खरेदी करण्याची वेळ का, असा सवाल नागरिक करत आहेत.