Onion Export| केंद्र सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर घालण्यात आलेली बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागील अनेक दिवसांपासून कांद्याचा प्रश्न चर्चेत होता. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे आणि कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला होता. परंतु आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
कांद्याचे दर आटोक्यात राहावेत यासाठी मोदी सरकारने कांद्यावर निर्यात बंदी आणली होती. मात्र, यामुळे सामान्य शेतकऱ्यांमध्ये त्याविषयी नाराजी होती. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी राज्यातील महायुतीचे नेते प्रयत्न करत होते. आता या संदर्भात केंद्राने मोठा निर्णय घेतला आहे.
अटींसह कांदा निर्यात खुली Onion Export|
केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेताना काही अटींसह कांदा निर्यात खुली केली आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार कोणताही निर्यातदार प्रति मेट्रिक टन 550 डॉलरपेक्षा कमी किंमतीत निर्यात करू शकणार नाही. यामुळे आता कांद्याची निर्यात करणं शक्य होणार आहे.
देशात कांदा निर्यात खुली केल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवारांनी पत्रकार परिषद घेत निर्यात बंदी उठवल्यामुळे केंद्र सरकार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. “राज्यातील महायुतीच्या सर्व नेत्यांनी कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी यासाठी प्रयत्न केले असून केंद्राने अखेर हा निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.” असे केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, “550 डॉलर मॅट्रिक टन कांद्याचे किमान मूल्य निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल आणि किमान मूल्याचा कांदा खरेदी करता येणार नाही. साधारणपणे कांद्याला प्रति किलो 46 रुपये इतका भाव मिळणार आहे.”
लोकसभा निवडणुकीत भाजपला होणार फायदा? Onion Export|
दरम्यान, महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने 7 डिसेंबर 2023 रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ही निर्यातबंदी 31 मार्च 2024 पर्यंतच लागू होती. परंतु सरकारने 22 मार्च 2024 रोजी एक अधिसूचना जारी करून निर्यातबंदी अनिश्चित काळासाठी वाढवली होती.
यानंतर 25 एप्रिल 2024 रोजी गुजरातमधून 2000 मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यात करण्यास सरकारने मान्यता दिल्यावर महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर देशात कांदा निर्यात खुली केल्यानंतर याचा फायदा महाराष्ट्रातील तीन टप्प्यात होणार मतदानावर दिसून येणार का? याचा फायदा भाजपला होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.