maharashtra weather – राज्यातील अनेक भागात उष्णचा चटका चंगलाच वाढला आहे. त्यातच महाराष्ट्रात पुढील 24 तासांत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम आहे. राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. त्यातच कुठे ऊन तर कुठे पाऊस अशी परिस्थिती असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार १ मे रोजी राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यानंतर दोन दिवस राज्यात सामान्य वातावरण पाहायला मिळणार आहे. तर पुन्हा 3 मेपासून राज्यात तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हात बाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पुढील 24 तास महत्त्वाचे असून हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट येणाचा अंदाज वर्तवला आहे. तर दुसरीकडे कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात कोरडं वातावरण पाहायला मिळणार आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा या भागातही दमट आणि कोरडं वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता
एकीकडे राज्यात उन्हाचा कडाका असताना काही ठिकाणी अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवड्यातील बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.