मुंबई – महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा नुकतीच मुंबईतील बीकेसी मैदानावर पार पडली. यावेळी तिन्ही पक्षातील नेतेमंडळी उपस्थित होते. या सभेत ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोरदार टीका केली. यानंतर आता या सभेबाबत भाजपसह शिंदे गटातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
नितेश राणे म्हणाले,’मुंबई तोडण्याचा डाव गुजरातमधून शिजतोय असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावर आता तुम्हाला शाह आडनावाची अॅलर्जी वाटतेय. तर, गुजराती बंधूंचा पैसा कसा चालतो तुम्हाला? तुमचा मालक बाहेरगावी जातो तिकडचा खर्च कोणाचा असतो? एक पैसाही उद्धव ठाकरेंच्या खिशातला जात नाही. यांचा सगळा खर्च हे उद्योगपती करत असतात. ते कसं चालतं? असे सवाल उठवत सडकून टीका केली आहे.