मुंबई – राज्य पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज अधिवेशनाला आले होते. यावेळी त्यांनी विधानभवनातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात जाऊन सदिच्छा भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या असून उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. साधारण 5 मिनिटे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि अन्य शिवसेना नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना मोठा गुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘अजित पवार यांना भेटलो. चांगलं काम करा, मूळ विषयाकडे दुर्लक्ष करू नका असं अजित पवार यांना बोललो. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आता त्यांच्याकडे आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. शरद पवारांच्या भूमिकेवर दोन्ही नेत्यांत चर्चा झाल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. काही वर्ष सोबत काम केल्यानंतर आता अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून फडणवीस- शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे या दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
#WATCH | Former Maharashtra CM Uddhav Thackeray meets Maharashtra Deputy CM Ajit Pawar, in Mumbai pic.twitter.com/RAIrI4SFWT
— ANI (@ANI) July 19, 2023
देश आणि मातृभूमीवर प्रेम करणारे पक्ष एकत्र –
विधानभवनाच्या आवारात पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचा लढा कोणत्याही व्यक्ती किंवा पक्षाविरुद्ध नाही, तर हुकूमशाहीविरुद्ध आहे. देश आणि मातृभूमीवर प्रेम करणारे पक्ष एकत्र आले आहेत. नेते, पंतप्रधान, मुख्यमंत्री येतात आणि जातात. पण जो आदर्श ठेवला जात आहे तो देशासाठी घातक आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका –
उद्धव ठाकरे म्हणाले, अजित पवार यांच्यासोबत मी अडीच वर्षे काम केले आहे, त्यांची कामाची पद्धत मला माहीत आहे. इतर लोक सत्तेसाठी धावत आहेत पण ते राज्यातील जनतेला वेळीच मदत करतील अशी अपेक्षा आहे. पुन्हा एकदा राज्याच्या तिजोरीची चावी अजित पवार यांच्याकडे आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका, असे अजित पवारांना सांगितल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.