मुंबई – काल बंगळुरूमध्ये विरोधकांची एक मोठी बैठक झाली, ज्यामध्ये नवीन आघाडीला ‘इंडिया’ असे नाव देण्यात आले आहे. आता विरोधकांच्या या नव्या आघाडीच्या नावावरून शिंदे गटाच्या (शिवसेना) खासदाराने आक्षेप घेतला आहे. इंडिया हा शब्द विरोधकांना वापरण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट मत या खासदाराने व्यक्त केले आहे.
बंगळूर येथे काल विरोधकांची जी बैठक झाली त्या बैठकीत आगामी लोकसभेसाठी विरोधकांची एकजूट किती महत्वाची आहे यावर चिंतन झाल्याचे समजते. विरोधी गटाची पुढील बैठक मुंबई येथे पार पडणार आहे. मात्र आता या बैठकीवरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी विरोधकांवर निशाना साधला आहे.
राज्यात पावसाळी अधिवेशन सुरु असून या पार्श्वभूमीवर राहुल शेवाळे माध्यमांशी बोलता होते. इंडिया हे नाव लावण्याचा विरोधकांना अधिकार नाही. इंडिया म्हणजे मोदी ही आमची भावना आहे, हे सगळ्या जगाला माहिती आहे,असं राहुल शेवाळे यावेळी बोलताना म्हणाले.तसेच विरोधक हे त्यांच्या कुटुंबासाठी एक झाले आहेत. त्यांची बैठक त्यांच्या कुटुंबासाठी आणि मुलाबाळांची होती असं देखील शेवाळे यावेळी म्हणाले.
काय झालं विरोधकांच्या कालच्या बैठकीत
बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, हा लढा भाजपच्या विचारधारेविरोधात आहे. ही लढत एनडीए आणि ‘इंडिया’ यांच्यात आहे. या बैठकीसाठी देशभरातील तब्बल २६ विरोधीपक्ष आणि त्यांचे प्रमुख आले होते. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी एकसंघ राहण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.