बेनोनी (दक्षिण आफ्रिका) – आयसीसीच्या १९ वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज (मंगळवार) भारताची लढत यजमान दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना न गमावलेल्या भारतीय संघालाच या स्पर्धेचा संभाव्य विजेता मानले जात आहे. मात्र, आता उपांत्य लढतीत यजमान संघाचे आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे. अंडर 19 विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होतील.
उपांत्य फेरीपूर्वी भारताची या स्पर्धेतील वाटचाल अत्यंत स्वप्नवत राहिली आहे. सलामीच्या सामन्यात भारताने बांगलादेशवर ८४ धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर आयर्लंडचा २०१ धावांनी पराभव केला होता. त्यानंतर अमेरिकेवरही २०१ धावांनीच मात केली होती. तर बलाढ्य न्यूझीलंडला २१४ धावांनी पराभूत केले होते.
सुपर सिक्स गटाच्याच लढतीत भारताने नेपाळचा १३२ धावांनी पराभव केला होता. या विजयासह भारतीय संघाने स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. आता या फेरीत त्यांचा सामना घरच्या मैदानावर खेळत असलेल्या दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. दुसरीकडे अन्य उपांत्य लढत ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान यांच्यात गुरुवारी रंगणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना येत्या रविवारी होणार आहे.