India U19 vs USA U19 World Cup 2024 : दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने रविवारी (28 जानेवारी) अ गटातील तिसरा आणि शेवटचा सामना जिंकत विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली. त्यांनी ब्लोमफॉन्टेन येथे अमेरिकेचा 201 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने थाटात सुपर सिक्समध्ये धडक मारली आहे. अर्शीन कुलकर्णी सामनावीर ठरला.
तीन सामन्यांत भारतीय संघाचे सहा गुण आहेत. त्याचबरोबर अमेरिका एकही सामना न जिंकता स्पर्धेतून बाहेर पडली आहे. अ गटात भारत अव्वल ठरला. त्याचबरोबर बांगलादेश तीन सामन्यांत चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. आयर्लंडचा संघ दोन गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिला. अमेरिकेने विजयाचे खाते उघडले नाही आणि ते तळाच्या चौथ्या स्थानावर राहिले.
3️⃣ wins out of 3️⃣ for the #BoysInBlue 🙌🏻
Opener Arshin Kulkarni is adjudged the Player of the Match for his solid ton 👏🏻👏🏻#TeamIndia register a 201-run win over USA
Scorecard ▶️ https://t.co/OAbsdAHOj5#BoysInBlue | #INDvUSA pic.twitter.com/hMILAYvmEz
— BCCI (@BCCI) January 28, 2024
दरम्यान, अमेरिकेने नाणेफेक जिंकून या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 50 षटकात 5 विकेट गमावत 326 धावा केल्या होत्या. भारताकडून फलंदाजीत अर्शीन कुलकर्णीने 118 चेंडूत सर्वाधिक 108 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत आठ चौकार आणि तीन षटकार मारले. मुशीर खानने 76 चेंडूत 73 धावांची खेळी केली. कर्णधार उदय सहारनने 35 धावा केल्या. प्रियांशू मोलिया 27 धावा करून नाबाद राहिला. आदर्श सिंगने 25 तर सचिन धसने 20 धावा केल्या. अमेरिकेकडून गोलंदाजीत अतिंद्र सुब्रमण्यमने सर्वाधिक 2 बळी घेतले. तर आरीन नाडकर्णी, आर्य गर्ग आणि ऋषी रमेश यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
अर्शीन कुलकर्णीच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 5 गडी गमावून अमेरिकेविरुद्ध 326 धावांची मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात अमेरिकेचा संघ 50 षटकांत 8 गडी गमावून केवळ 125 धावा करू शकला आणि सामना 201 धावांनी गमावला. विजयासाठी 327 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेची सुरुवात खराब झाली. संघाने 10 षटकांत तीन विकेट गमावल्या. सलामीवीर प्रणव चेट्टीपलायम (2) आणि भव्य मेहता (0) खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले. 18 चेंडूत 8 धावा करून कर्णधार ऋषी बाद झाला. सिद्धार्थ कप्पाने 60 चेंडूत 18 धावा केल्या. मानवला खातेही उघडता आले नाही. पार्थने दोन धावा केल्या. नाडकर्णी 20 धावा करून बाद झाला. अमेरिकडून उत्कर्ष श्रीवास्तवने 73 चेंडूत 40 धावांची सर्वाधिक खेळी केली.
भारताकडून गोलंदाजीत या सामन्यात नमन तिवारी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. नमन तिवारीने 9 षटकात 20 धावा देत 4 बळी घेतले. तर राज लिंबानी, सौम्या पांडे, मुरुगन अभिषेक आणि प्रियांशू मोलिया यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. आता सुपर-6 मध्ये टीम इंडियाचा सामना नेपाळ आणि न्यूझीलंडच्या संघांशी होणार आहे.