नेवासा (प्रतिनिधी) – वंजारवाडी (ता.नेवासा) येथे सुरू असलेल्या २१ व्या अखंड हरीनाम सप्ताहात संत वामनभाऊ प्रतिष्ठान व संत भगवान बाबा प्रतिष्ठान वंजारवाडी यांच्यावतीने खासदार संजय राऊत यांना यंदाचा ७ वा समाजभूषण पुरस्कार शनिवार (दि.२७) रोजी सायंकाळी ६ वाजता ह.भ.प विष्णू महाराज केंद्रे (उत्तराधिकारी ज्ञानेश्वरी मंदिर आळंदी) यांच्या हस्ते व माजी मंञी आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
यापूर्वी जिल्ह्याचे जेष्ठनेते साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख, ह.भ.प पंढरीनाथ तांदळे, आमदार नरेंद्र दराडे, डॉ तात्याराव लहाने, माजी आमदार पांडुरंग अभंग, महंत तुकाराम महाराज यांना या समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
या पुरस्कार वितरण प्रसंगी आमदार शंकरराव गडाख यांच्या पुढाकाराने कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या निधीतून पुर्णत्वास आलेल्या सांस्कृतिक भावनांचे उद्घाटनही खासदार राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना शंकरराव गडाख म्हणाले की,धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या वंजारवाडी येथील मोठी परंपरा असलेल्या सप्ताहात संजय राऊत यांचा सन्मान होतो आहे.
संजय राऊत हे फक्त राजकीय पत्रकारिता करणारे नेते नाहीत तर सर्वच विषयाचा अभ्यास असणारे नेते आहेत. ज्या माणसाच्या ते संपर्कात येतात त्या माणसाला ते किधीही विसरत नाहीत असे आमदार यावेळी गडाख यांनी सांगितले. पुरस्कार मिळाल्याबद्दल संजय राऊत यांचे आमदार गडाख यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
जलसंधारण खात्याच्या माध्यमातून राज्यभर निधी देता आला व त्या बदल्यात इतर मंत्र्यांकडून हक्काने निधी मंजूर करून घेत तालुक्यातील कामे ही मार्गे लावले असे म्हणत वंजारवाडी येथील सांस्कृतिक भवन मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून आग्रहाने मंजूर करून आणल्याचे यावेळी गडाख यांनी आवर्जून सांगितले.
संजय राऊत म्हणाले की, संतांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार उर्जादायी आहे. सर्वत्र माझ्यावर टीका होत असतांना वंजारवाडी ग्रामस्थांनी दिलेल्या पुरस्काराने लढण्यास बळ मिळाले आहे. राजकीय अडचणीत असताना या गावाने दिलेला पुरस्कार बळ देणारा आहे. उद्धव ठाकरे यांची राज्यात सत्ता आल्यानंतर त्यांना आवर्जून वंजारवाडीला भेटीसाठी घेऊन येणार असल्याचे यावेळी बोलतांना सांगितले.
गावाचा एकोपा टिकवत शेती व मातीवर प्रेम करणारे माणसे सामाजिक भान जपत सप्ताहात विविध उपक्रम राबवत आहे हे कौतुकास्पद आहे. राजकीय जीवनात पदे येतात जातात आपण एकनिष्ठ राहिल्याने माणसे मोठी होतात. स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आज आपल्यापर्यत मी पोहचू शकलो. असे म्हणत स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रती राऊत यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पुरस्कार दिल्याबद्दल ग्रामस्थ व प्रतिष्ठानचे आभार मानले.
याप्रसंगी शंकरराव गडाख, माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी महापौर भगवान फुलसौंदर, उपनेते साजन पाचपुते, पंढरीनाथ महाराज तांदळे, अतुल महाराज आदमने, भगवानराव दराडे, महादेव दराडे, दिनकरराव गर्जे, मदनराव डोळे, रामेश्वर दराडे, ईश्वर दराडे, गणेश दराडे, अशोक दराडे, प्रकाश शेटे आदींसह वंजारवाडी सोनई परिसरातील नागरिक उपस्थित होते.