अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करण्याची केली सुचना
नवी दिल्ली – पाकिस्तानच्या भेटीवर असलेले तुर्कस्तानचे अध्यक्ष एरडोगन यांनी काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानची बाजू उचलून धरीत भारताच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर भारतानेहीं तीव्र प्रतिक्रीया दिली असून भारताने म्हटले आहे की जम्मू काश्मीर हा पुर्णपणे भारताचा भाग असून त्या कारभारात हस्तक्षेप करण्याचा अन्य कोणालाही अधिकार नाहीं आणि तुर्कीच्या अध्यक्षांनी नोंदवलेले आक्षेप आम्ही पुर्णपणे धुडकाऊन लावत आहोत असे भारताने म्हटले आहे.
काश्मीरच्या संबंधात तुर्कीच्या नेतृत्वाने वस्तुस्थिती समजून घ्यावी, पाकिस्तानी हद्दीतून दहशतवादाचा मोठा धोका या प्रदेशाला कायमच असतो ती बाबही त्यांनी ध्यानात ठेवावी असेही भारताने त्यांना सुनावले आहे. भारताने विरोध करूनही तुर्कस्तानच्या अध्यक्षांनी काश्मीरचा उल्लेॅख करून भारताच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवतानाच पाकिस्तानची बाजू उचलून धरली आहे.
तुर्कस्तानच्या अध्यक्षांनी म्हटले आहे की, गेली अनेक दशके काश्मीरी बांधव अत्यंत हालाकीची स्थिती सोसत आहेत. आणि भारताने घेतलेल्या एकतर्फी भूमिकेमुळे त्यांच्या हालाकित भरच पडली आहे असे एरडोगन यांनी म्हटले आहे. न्याय आणि चर्चेच्या बाजूने काश्मीर प्रश्नाची सोडवणूक व्हावी अशी सुचनाही त्यांनी भारताला केली आहे. गेल्या वर्षीै सप्टेंबर महिन्यातही एरडोगन यांनी संयुक्तराष्ट्रात काश्मीर प्रश्नाचा उल्लेख करून भारताला दूषणे देण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळीही भारताने अंतर्गत कारभारात ढवळाढवळ न करण्याची सुचना त्यांना केली होती.