बुध – भारतात शेतीमधील घटणारे उत्पादन व जमिनीचे आरोग्य, मनुष्याचे जीवनमान व पर्यावरणावर रासायनिक खते व कीटकनाशकांतील घातक घटकांमुळे सजीव सृष्टीचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी विषमुक्त शेती व धान्य निर्माण करणे काळाची गरज बनत चालली आहे, असे मत आमदार महेश शिंदे यांनी बुध येथील ग्रामपंचायत सभागृहात कृषी विभागाने आयोजित केलेल्या खरीप हंगाम नियोजन बैठकीमध्ये व्यक्त केले.
महेश शिंदे म्हणाले, “शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सेंद्रीय शेतीचा अवलंब करावा. आर्थिक उत्पन्न देणाऱ्या फळबाग लागवडीचा समावेश, शेळीपालन करुन पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. रासयनिक खताचा व किटकनाशकांच्या अतिवापरामुळे पर्यावरणासह मनुष्याचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी देशी गायीचे शेण व गोमूत्र यांचा वापर करुन दशपर्णी अर्क, जीवामृत, गांडूळ व नाडेप यांच्यापासून खतनिर्मितीस प्राधान्य द्यावे.’ याप्रसंगी बुधचे सरपंच अभय राजेघाटगे, उपविभागीय कृषी अधिकारी महेश झेंडे, तालुका कृषी अधिकारी अरुण जाधव, मंडळ कृषी अधिकारी सचिन लोंढे, कृषी पर्यवेक्षक मुकुंद म्हेत्रे, नामदेव कोळेकर, कृषी सहाय्यक संतोष नेवसे, कुंडलिक जाधव, संतोष शिंदे, किरण काळे, हरिदास भोसले, रुपाली पंडित, बचत गटाच्या महिला व शेतकरी उपस्थित होते.
प्रास्ताविकात कृषी पर्यवेक्षक मुकुंद म्हेत्रे म्हणाले, “देशी गाई शेतीचा आत्मा असून शेण व गोमूत्राचा जास्तीत जास्त वापर केल्याने जमिनीतील जिवाणू क्रियाशील होतात व जमीन समृध्द होते. माती, पाणी व पर्यावरण रक्षणासाठी सेंद्रिय घटकांचा वापर काळाची गरज आहे.’कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती संतोष नेवसे यांनी दिली.
बांधावरील फळबाग लागवड, दशपर्णी अर्क तयार करणे, जीवामृत, नाडेप कंपोष्ट, गांडूळ खत युनिट निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी शेतकऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन नेवसे यांनी केले. नेवसे यांच्या उत्कृष्ट कायाबद्दल आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. विजय खराटे, गणेश सातपुते, शशिकांत कचरे, प्रभाकर सुर्यवंशी, सुशांत जगदाळे, नरसिंग जगदाळे, अमोल इंगळे, रामचंद्र जगदाळे, आशा जगदाळे, शेतकरी व महिला उपस्थित होत्या.