वाई – वाई तालुक्यातील ग्रामीण भागात करोनाचा विलखा वाढत असल्याने लोकांमध्ये भीती आणि प्रशासनावरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज नव्या गावात रुग्ण आढळत असल्याने तालुक्याची धडधड वाढते आहे.
करोनाच्या संकटामुळे जीवनावश्यक व्यवहार सोडले तर भीतीने अनेक व्यवसाय बंद आहेत. एसटी बस फलाटवर लावूनही प्रवासी नसल्याने बस जाग्यावरच उभ्या आहेत. महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान रोज होत आहे. त्यातच वाई तालुक्यातील अनेक गावांत दररोज नवीन करोनाबाधित सापडत असल्याने तालुक्याचा विळखा वाढते आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार वाई तालुक्यातील चार नवीन गावांत करोनाबाधित रुग्ण आढळल्याने शासनाने दिलेली सवलत लोकांच्या जीवाशी येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाई शहराच्या हाकेच्या अंतरावर करोना संकट आ वासून उभे आहे, शुक्रवारी पसरणी, बावधन, कडेगांव, अमृतवाडी या गावांमध्ये करोनाचा शिरकाव झाल्याने तालुक्यातील प्रत्येक गाव दबावाखाली वावरत आहे.
हॉटेल्स, मॉल, सार्वजनिक ठिकाण, आठवडे बाजार, सरकारी व खासगी बॅंकेत लोकांची गर्दी होत आहे. हात स्वच्छ धुणे, गर्दी टाळणे, हस्तांदोलन करू नये, मास्कचा वापर याबाबत जागृती करणारे फ्लेक्स बोर्ड शोपीस बनून राहिले आहेत. बाजार समितीमध्ये आजही ग्रामीण भागातून शेतकरी शेतातील माल विक्रीसाठी आणत आहेत. शहरातील छोटे- मोठी दुकाने सुरू आहेत.
खूप कमी नागरिक मास्क वापरताना दिसत आहेत. पर्यटन ठिकाणी करोनाची तपासणी करूनच यावे असे आवाहन करण्यात येऊनही शहराच्या नाक्यावर तपासणी होणे गरजेचे असताना तालुका वैद्यकीय अधिकारी अजूनही अनभिज्ञ आहेत. मुंबईमध्ये नोकरीनिमित्त गेलेल्या नागरिकांची घरी येण्यासाठी रांगा लागल्या आहेत. मुंबईतून किंवा बाहेरून येणाऱ्या व्यक्ती बाधित होत असल्याने वाई तालुक्यात दररोज नवीन गावात करोनाचा शिरकाव होत आहे.
आरोग्य विभागाने एसटी स्टॅंडवरच तपासणी पथक नेमावे, अशी मागणी करण्यात येत आहे. मुंबई- पुणे वा इतर शहरातून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. तसे न झाल्याने वाई तालुक्यात रुग्णांचा आकडा दररोज वाढतच चालला आहे.
वाई तालुक्यातील कडेगावमधील 34 वर्षीय पुरुष, पसरणीतील 48 वर्षीय पुरुष, अमृतवाडीमधील 50 वर्षीय पुरुष, बावधन मधील 57 वर्षीय पुरुष यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना किसनवीर महाविध्यालयातील कक्षात हलविण्यात आले आहे, तसेच ही गावे सील करण्यात आली आहेत. त्यांच्या कुटुंबांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. हे सर्व जण मुंबई- पुणेहून आलेले प्रवासी आहेत,