विनोद पोळ
कवठे – मर्यादेपेक्षा अधिक भरधाव वेगात जाणाऱ्या साडेपाच हजार वाहनांवर स्पीडगणच्या सहाय्याने महामार्ग पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीचा वापर करुन तीन लाख 91 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. खंबाटकी घाटालगत असलेल्या एस कॉर्नर ते आनेवाडी टोलनाका या दरम्यानच्या महामार्गावर या कारवाया करण्यात आल्या असल्याची माहिती, भुईज महामार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांनी दिली.
पुणे सातारा या महामार्गावरील वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. प्रत्येकजण आपले वाहन वेगाने पुढे कसे जाईल याच्या प्रयत्नात असतो. अशावेळी स्वत:सह वाहनांमधील प्रवासी अथवा कुटुंबियांची कसलीही काळजी वाहन चालक, मालक घेत नाहीत. वेगावर नियंत्रण न ठेवता सुसाट वाहने चालविली जातात.
वास्तविक पाहता महामार्गावर वाहन चालवताना दुचाकी 70, ट्रक 80 तर चारचाकी वाहनांनी 90 इतकी वेगमर्यादा ठेवण्याचा आदेश महामार्ग पोलीस उपाधीक्षक व महामार्ग सुरक्षा पथक पुणे विभागाचे प्रीतम यावलकर यांनी काढले आहेत. गेल्या महिनाभरापासून सपोनि. दत्तात्रय गुरव हे आपल्या सहकाऱ्यांसह या आदेशांची कडक अंमलबजावणी करत आहेत.
खंबाटकी घाटातील एस कॉर्नर या ठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघतांवर तोडगा निघत नव्हता, याची गंभीर दखल महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधीक्षकांनी घेवून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश भुईंज महामार्ग पोलीस ठाण्याला दिले होते. त्या पार्श्वभूमीवर सध्याच्या कारवाया सुरु असल्याचे गुरव यांनी सांगितले.
आजपर्यंत दरवर्षी देशभरातील रस्ते अपघातात सुमारे एक लाख तीस हजार लोक मरण पावतात तर सुमारे 2 लाख लोक कायमचे जायबंदी होतात. यातील बहुतांश लोक 15 ते 45 वर्ष या कमावत्या वयोगटातील तरुण असतात. अपघातांचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे अतिवेगाने वहान चालवणे हे आहे.
ही बाब लक्षात घेवून राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच अन्य रस्त्यांसाठी वेगवेगळी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने रस्त्यावरील दोन निश्चित ठिकाणातील अंतर वाहनाने किती वेळात पार केले या माहितीच्या आधारे वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जोशीविहीर महामार्ग पोलीस कोणतेही वाहन न थांबवता स्पीडगणच्या सहाय्याने एस. कॉर्नरवर दबा धरून बसलेले असतात. या कारवाईमुळे गेल्या महिन्याभरापासून खंबाटकी उताराच्यालगत एस. कॉर्नरवर अपघात होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, सर्व वहानचालकांनी आपल्याला दंड होणार नाही याची काळजी घेतल्यास आपले पैसेही वाचतील व स्वतःसह कुटुंबाचेही जीव वाचतील, अशी काळजी घ्यावी, असे आवाहन भुईंज महामार्ग पोलीस ठाण्याचे स.पो.नि. दत्तात्रय गुरव यांनी केली आहे.