नगर -काही भागात दुष्काळ तर काही भागात भरपूर पाऊस अशी विषम परिस्थिती ग्लोबल वार्मिंगमुळे झाली आहे. त्यामुळे वृक्षारोपणाचे महत्व आता सर्वांनाच पटू लागले आहे. मात्र, कृतीतून प्रत्यक्षात वृक्षारोपण व संवर्धन होणे गरजेचे आहे.
तंत्रनिकेतनमधील भावी अभियंता पर्यावरणपूर्वक भारत घडवितील, यासाठी आज या ठिकाणी वृक्षारोपण करुन एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे नूतन अध्यक्ष ऍड. अमित बोरकर यांनी केले.
रोटरी क्लबच्या नववर्षारंभी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर -च्यावतीने शासकीय तंत्रनिकेतन येथे 100 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी नूतन सचिव पुरुषोत्तम जाधव, तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा.मुकुंद सातारकर आदिंसह रोटरी क्लबचे नुतन पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी सचिव पुरुषोत्तम जाधव यांनी रोटरी क्लबने नेहमीच सामाजिक दायित्व जपले आहे. गरजूंना मदत, विद्यार्थ्यांना मदत, महिला सबलीकरण, आरोग्य याच बरोबर पर्यावरण रक्षणासाठीही कार्य करत आहोत.
आज वृक्षारोपण केल्याने पुढील काळात हा परिसर बहरुन येईल. तंत्रनिकेतन व रोटरी एकत्रित असेच उपक्रम हाती घेतील, असे सांगितले. प्राचार्य सातारकर यांनी संस्थेचा शैक्षणिक सह सामाजिक कार्यात नेहमीच सहभाग राहिला आहे. आज या ठिकाणी लावण्यात आलेल्या वृक्षांचे संवर्धन आम्ही चांगल्या पद्धतीने करु. भविष्यात हा परिसर निसर्ग समृद्ध झालेला असेल, असे सांगितले.