– विनोद मोहिते
इस्लामपूर – सांगलीतील २६ रुग्णांपैकी पैकी २२ रुग्ण आता कोरोनामुक्त झालेत. आपण कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होतोय. जिल्ह्यात २६ रुग्ण आढळल्याने पालकमंत्री व इस्लामपूर मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून दुहेरी दडपणात होतो, मात्र आता दिलासा मिळाला आहे. आज मी काहीसा चिंतामुक्त झालोय, अशा शब्दात जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
जिल्ह्यात एकट्या इस्लामपुरात व एका कुटुंबात कोरोना रुग्ण आढळल्याने इस्लामपूरसह सांगली जिल्हा धास्तीत होता. या दरम्यान प्रशासन दिवस-रात्र राबले. पाटील यांनी या काळात देखील जिल्हा पिंजून काढला. तालुकानिहाय प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी यांच्या बैठका घेवून लोकांना धीर देतानाच उपाययोजना करण्यावर भर दिला. मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तातडीने यंत्रसामग्री व आरोग्य सुविधा वाढवली. जिल्ह्यात यशस्वी लॉकडाऊन करण्यासाठी पोलीस दल, प्रशासनाचे बळ वाढवले. परिणामी अठराव्या दिवशी रिझल्ट मिळाला. गुरुवारी रात्री उशिरा २६पैकी २४रुग्ण कोरोनामुक्त झाले.
त्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना पाटील पुढे म्हणाले, माझ्या इस्लामपूर मतदारसंघातील जे कुटुंब कोरोनाबाधित झाले होते ते आज पूर्णपणे कोरोनामुक्त झालंय. सांगली जिल्ह्यामध्ये यापुढे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची मला खात्री आहे. पण अद्यापही लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे. सांगलीच्या जनतेने दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. नागरिकांनी विलगीकरणाचा राबवलेला प्रयोग १०० टक्के यशस्वी केल्याने आपण यावर मात करू शकलो. पण गाफील राहू नका. माझी महाराष्ट्रातील जनतेने शासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करा तर आणि तरच आपण या रोगावर विजय मिळवू शकू, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले आहे.