पुसेगाव, (प्रतिनिधी)- भाजपला देशातील लोकशाही मोडून हुकुमशाही आणायची आहे. त्यांना संविधान आणि घटना बदलायची आहे. जनतेला त्यांचा हा डाव समजला असल्याने चारशे पारची वल्गना करणारे आता दोनशेपर्यंतही पोहचणार नाहीत. राज्यात भाजपचा वारु शरद पवारच रोखू शकतात हे माहित झाल्यानेच मोदी महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत. सातारा मतदारसंघातील वातावरण पाहता शशिकांत शिंदे खासदार झाल्यात जमा आहेत, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ पुसेगाव येथील सभेत ते बोलत होते. सभेस माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या छायाताई शिंदे, विजयराव कणसे , जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, हणमंत चवरे, प्रताप जाधव, सचिन मोहिते, किरण माने, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, पुसेगाव आणि खटाव जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते.
माजी मंत्री राजेश टोपे म्हणाले, मोदी गॅरंटी फसवी आहे. भाजपचे सर्वत्र जुमले सुरु आहेत. देशात अराजकता माजली आहे. सातारा जिल्ह्याने देशाला यशवंत विचार, पुरोगामित्व, समतेचा विचार आणि नितीमूल्यांचे राजकारण दिले. सध्या जिल्ह्यात महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे.
मान गादीला पण मत तुतारीलाच देण्यासाठी जनता सरसावली आहे. शशिकांत शिंदे म्हणाले, इथल्या जनतेने सासुरवास भोगला आहे. त्याचा वचपा या निवडणुकीत निघणार आहे. तत्वाची लढाई जनतेनेच हाती घेतल्याने भाजपाचा माज या निवडणुकीत उतरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी डॉ. सुरेश जाधव, छाया शिंदे, अजित पाटील चिखलीकर, प्रा. यशवंत गोसावी, सागर साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. पक्षाचे तालुकाध्यक्ष जोतीनाना सावंत यांनी स्वागत केले. सागर सांळुंखे यांनी प्रास्ताविक केले. संदीप जाधव यांनी आभार मानले .