मुंबई – मला चुकीच्या पद्धतीने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गोवण्यात आले होते. तुरुंगात जाणे किंवा पक्ष बदलणे, हे दोनच पर्याय माझ्याकडे शिल्लक होते. त्यामुळे जड अंतःकरणाने मी पक्ष बदलला. माझ्यावर तर दबाव होताच, पण माझ्या पत्नीचेही नाव गोवल्यांतर माझ्यापुढे पर्याय उरला नाही, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे नेते आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी केला. मुंबईमध्ये २० मे रोजी लोकसभेसाठी मतदान होणार आहे. त्याआधीच वायकर यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेमुळे विरोधकांना मात्र आयताच मुद्दा मिळाला.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते. त्यांनी काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना याठिकाणी उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावर आता रवींद्र वायकर यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे.
रवींद्र वायकर म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळेपासून मी हाती शिवबंधन बांधले. बाळासाहेबांच्या शिवसेनेत ५० वर्ष राहिल्यानंतर मला उद्धव ठाकरेंची साथ सोडावी लागली. परंतु नियतीने माझ्यासमोर प्रश्न निर्माण केले होते. नियती कसा बदल घडवून आणते, असे ते म्हणाले.
आपल्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत वायकर म्हणाले, “माझ्याविरोधात झालेली तक्रार ही फौजदारी स्वरुपाची नव्हतीच. मला सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावे लागले. माझे प्रकरण राजकीय होते, असे वकिलांनीही मला सांगितले. माझ्या मदतीसाठी कुणीही पुढे आले नाही. त्यामुळे माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता, खुलासा त्यांनी केला.