मुंबई – महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यानंतर करण्यात आलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप तरी झालेला नाही. अशात शिवसेनेला पाठींबा देणारे बच्चू कडू शिंदे गटासोबत गेले. त्यानंतर आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाल्याचे पाहायला मिळाले. आज हे दोघे भांडत आहेत उद्या भाजप मिंधे गट एकमेकांच्या उरावर बसेल अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर खोक्यांचा आरोप केल्यानंतर बच्चू कडू यांनी देखील याला प्रत्युत्तर दिलय. राणा यांनी १ तारखेपर्यंत याचे पुरावे द्यावेत अन्यथा ७ ते ८ आमदार घेऊन वेगळा निर्णय घेऊ असा इशारा कडू यांनी दिला आहे. राणा आणि कडू या दोन्हही नेत्यांमधील वादावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय.
आज बच्चू कडू आणि रवी राणा हे भांडत आहेत. तर उद्या भाजप आणि शिंदे गट एकमेकांच्या उरावर बसतील अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे. शिंदे गटात सर्वच स्वार्थासाठी गेले होते. मात्र आता त्यांचा तिथे अपेक्षाभंग झालाय कोणालाही मंत्रीपद मिळण्याची आशा राहिलेली नाही असा सूतोवाच देखील राऊत यांनी यावेळी केला. एका मराठी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.