मुंबई – शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सध्या ठाकरे गटात असलेले गजानन कीर्तिकर भेटायला आले असल्याचे आणि त्यांच्यासोबत चर्चा झाली असल्याचा खुलासा केला आहे. कीर्तिकर यांनी माझ्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे देखील कदम यांनी यावेळी सांगितले. तसेच कीर्तिकर यांनी दसरा मेळाव्याला दिलेल्या मुलाखतीत भाजपसोबत जाण्याचे विचारले मांडले होते अशी आठवण देखील रामदास कदम यांनी यावेळी करून दिली.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना रामदास कदम यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. गजानन किर्तीकर हे शिंदे गटात प्रवेश करतील का असा सवाल विचारला असता रामदास कदम म्हणाले, त्यावर मी बोलणार नाही. आदित्य ठाकरे फक्त 40 आमदारांना बदनाम करण्याचं काम करतायत. त्यांनी तोच एककलमी कार्यक्रम हाती घेतलाय. आदित्य ठाकरे यांच्यावर शेंबडं मूल देखील विश्वास ठेवणार नाही, अशी टीका रामदास कदम यांनी यावेळी केली.अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या बॅनरबाबत देखील रामदास कदम यांनी भाष्य केलं.
अजित पवार यांच्या बॅनरबाबत देखील केलं भाष्य
बारामतीमध्ये अजित पवार यांच्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख आढळून आला. त्याबाबत देखील रामदास कदम यांनी भाष्य केलय. स्वप्न बघायला कुणाची अडचण नाही. शिवसेनेच्या आमदारांना संपवून त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले नसते तर शिवसेना संपली असती. अजितदादा मुख्यमंत्री झाले असते.