मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ९ मंत्र्यांचा रविवारी शपथविधी पार पडला. अजित पवार गट राज्य सरकारमध्ये सामील झाल्यामुळे शिंदे गटात नाराजी असल्याच्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांमध्येही नाराजी असल्याचे आले दिसून येत आहे. याविषयी बच्चू कडूंनी आपली नाराजी स्पष्ट बोलून दाखवली आहे.
शिंदे गटातील आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशामुळे नाराज असल्याच्या चर्चांवर बच्चू कडूंना माध्यमांनी विचारणा करता त्यावर कडूंनी आपली भूमिका स्पष्ट केली. याविषयी बोलताना, “नाराज व्हायचं कारण नाही. कारण खोके म्हणणारे आता ओके झालेत. सरकार चांगलं झालं. स्वागतच आहे. शिंदे आणि फडणवीसांच्या वेगवान विकासाची भुरळ अजित पवारांना पडली. त्यामुळे विकासात आपण मागे राहू नये यासाठी ते सरकारमध्ये सामील झाले, उपमुख्यमंत्री झाले. त्यांचं अभिनंदनच आहे”, असे बच्चू कडू म्हणाले.
पुढे त्यांनी “जे शेवट आले, त्यांना आधी जेवण मिळालं आणि आधी आलेल्यांना आता शेवट जेवण मिळणार काय माहीत. नाराज कुणी असेल तर माहीत नाही, पण आता नाराजी करून काही होणार नाही. फक्त त्यांना नाराज करू नये एवढंच आमचं म्हणणं आहे”, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी घेतली.
दरम्यान, याआधीही बच्चू कडूंनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. “नाराजीचा सूर असला तरी तो दाखवता येत नाही. आपलेच ओठ, आपलेच दात आणि आपलीच जीभ आहे. आता कोणासमोर बोंबलावं अशी स्थिती आहे. आता काढला ना रस्ता, आता त्या रस्त्यावर काटे आहेत, वाटेत धरणं आहेत त्याला काही अर्थ नाही”, अशी भूमिका बच्चू कडूंनी मांडली याआधी मांडली आहे.