पुणे – शालेय पोषण आहार योजनेच्या उन्हाळी सुट्टीतील 34 दिवसांचे अर्थसहाय्य थेट विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार आहे. पहिल्यांदाच “डीबीटी’द्वारे हे अर्थसहाय्य देण्यात येत आहे.
यासाठी सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये आपले खाते उघडावे लागणार आहे. दरम्यान, मिळणारी ही रक्कम तुटपुंजी ठरणार आहे. विशेष म्हणजे, अर्थसहाय्याच्या तुलनेत बॅंकेचे खाते उघडण्यासाठीच जास्त खर्च येणार आहे.
केंद्र शासनाच्या आदेशानुसार मागील वर्षी उन्हाळी सुटीत तांदूळ व धान्यादी मालाच्या माध्यमातून पोषण आहार विद्यार्थ्यांना पुरवण्यात आला होता. यासाठी 180 कोटी रुपये खर्च झाले होते. यंदाही शाळांना दि.1 मे ते 14 जून अशी उन्हाळी सुट्टी होती.
या काळात करोनामुळे हा आहार पुरवठा झाला नव्हता. त्यापोटी आता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति दिन 4 रुपये 48 पैसे, तर सहावी ते आठवीसाठी 6 रुपये 71 पैसे याप्रमाणे अर्थसहाय्य देण्याच्या हालचाली सुरू आहेत.