नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज करोनाच्या संबंधात राष्ट्राला उद्देशून भाषण केले पण या भाषणात त्यांनी देशातील अडचणीत आलेला गरीब व मध्यमवर्गींच्या मदतीसाठी कोणतीही उपाय योजना जाहीर केलेली नाही, देशाच्या अर्थकारणाच्या उभारणीसाठीही त्यांनी कोणते पॅकेजही जाहीर केलेले नाही अशी टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी केली आहे. करोनाचा मुकाबला करण्यासाठीचा रोडमॅप कोठे आहे हे सरकारने जाहीर करावे असे आव्हानही त्यांनी सरकारला दिले आहे.
लोकांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणिव करून द्यायची आणि सरकारने मात्र त्यांचे कोणतेही कर्तव्य पाळायचे नाही हे योग्य नाही. आज अडचणीत आलेल्या देशाला बाहेर काढण्यासाठीचा आराखडा मोदींनी जाहीर करणे अपेक्षित होते पण त्याचाहीं उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केलेला नाहीं असेही सुर्जेवाला यांनी म्हटले आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनीही सरकारच्या या निष्क्रीयतेवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की आज देशात पैसा आहे अन्नही आहे पण गरीब आणि गरजूंसाठी अन्न किंवा पैशाची मदत जाहीर झालेली नाही.
पंतप्रधानांचे भाषण म्हणजे निरर्थक बडबड होती अशी टीका कॉंग्रेसचे दुसरे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी केली आहे. लोकांना त्यांच्या कर्तव्याची जाणिव करून देणाऱ्या सरकारने अडचणीत आलेल्या विविध घटकांच्या मदतीसाठी काय उपाययोजना केली आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.