मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लॉकडाऊनला 3 मे पर्यंत मुदतवाढ जाहीर केली. मात्र परराज्यातील प्रवासी मजूर आज मोठ्या संख्येने एकत्र येऊन आपापल्या राज्यांमध्ये परत जाण्यासाठी वाहनांची सोय करण्यात यावी, अशी मागणी करायला लागले होते. मात्र ही गर्दी नियंत्रणाबाहेर वाढल्याने अखेर पोलिसांना हस्तक्षेप करून गर्दीवर लाठीमार करावा लागला आणि मजूरांना पिटाळून लावावे लागले.
गेल्यामहिन्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून रोजंदारीवरील मजूरांच्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या मजूरांच्या दैनंदिन उपजिवीकेसाठी प्रशासन आणि काही स्वयंसेवी संस्थांकडून व्यवस्था केल्या जात आहेत. मात्र तरिही या मजूरांनी आपापल्या गावांना परत जाण्याचा आग्रह कायम ठेवला होता. त्यामुळेच आज पश्चिम बांद्रयाच्या रेल्वे स्थानकाजवळील बस डेपोच्या परिसरात दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर प्रवासी मजूरांची गर्दी व्हायला लागली आणि दुपारपर्यंत ही संख्या अंदाजे एक हजारापर्यंत जाऊन पोहोचली.
हे बहुतेक मजूर बांद्रयातील पटेल नगरी वस्तीमधील झोपडपट्टयांमध्ये राहणारे होते. आपापल्या गावी परत जाण्यासाठी वाहनांची सोय करण्याची मागणी हे मजूर करत होते. ते मूळचे पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्यांतील आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास लाठीमार करून गर्दीला पिटाळून लावले.
राजकारणाला सुरूवात
बांद्रयातील मजूरांच्या गर्दीवरून राजकारणाला सुरुवात झाली आहे. बांद्रयातील परिस्थिती आणि सूरतमधील दंगल ही स्थलांतरित कामगारांना घरी परत जाण्यासाठी केंद्र सरकारकडून सक्षम नसल्याचाच परिणाम आहे, अशी टीका राज्यातील आदित्य ठाकरे यांनी केली आहे. स्थलांतरित मजूरांना अन्न आणि निवारा नको आहे. त्यांना घरी परत जायचे आहे. लॉकडाऊन लागू केल्यापासून 24 तासांसाठी रेल्वे सुरू करण्याची मागणी केली गेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांबरोबरच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्येही हा मुद्दा उपस्थित केला होता, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.