महिला, निराधारांना 29 हजार कोटी रुपयांची मदत
नवी दिल्ली : करोना व्हायरसमुळे देशभरात लॉक डाऊन सुरू केल्यानंतर अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध क्षेत्रासाठी 1.70 लाख कोटी रुपयांच्या सवलती जाहीर केल्या होत्या. यावेळी सीतारामन यांनी गरिबासाठी गरीब कल्याण योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत विविध बाबीवर आतापर्यंत गरीब लोकांना 29 हजार 352 कोटी रुपयांची मदत दिली गेली आहे.
लॉक डाऊनचा सामना करण्यासाठी दारिद्र रेषेखालील लोकांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येत आहे.
गरीब महिलांना प्रत्येक महिन्याला 500 रुपये पुढील 3 महिने दिले जाणार आहेत. ही योजना जाहीर केल्यानंतर राज्य सरकार आणि बॅंकांनी कार्यक्षमरित्या काम करून या योजनेची अंमलबजावणी केली आहे. पंतप्रधान कार्यालयाचे या योजनाच्या अंमलबजावणीकडे लक्ष आहे असे अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. पाठविलेली रक्कम थेट लाभार्थीच्या खात्यात जमा झाली आहे. डिजिटल अर्थव्यवस्था सुधारल्यामुळे हे शक्य झाले असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
13 एप्रिलपर्यंत 32 कोटी 32 लाख लाभार्थ्यांना ही मदत देण्यात आली. आतापर्यंत 20 लाख 11 हजार मेट्रिक टन एवढे धान्य विविध राज्यातून वितरित करण्यात आले आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत 1 कोटी 39 लाख सिलेंडरची नोंदणी करण्यात आली. आतापर्यंत 97 लाख 80 हजार मोफत सिलेंडर वितरित करण्यात आले आहेत. 19 कोटी 80 लाख महिलांच्या जनधन खात्यामध्ये पाचशे रुपये जमा करण्यात आले आहेत. याअंतर्गत 13 एप्रिल पर्यंत 9930 कोटी रुपयाचे वितरण करण्यात आले आहेत.
वृद्ध, विधवा आणि निराधारांना 1400 कोटी रुपये देण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या लोकांना प्रत्येक महिन्याला 500 रुपये पुढील तीन महिन्यात दिले जाणार आहेत. आरोग्य सेवेत काम करणाऱ्यांचा 50 लाख रुपयांचा विमा न्यू इंडिया ऍश्युअरन्स या कंपनीच्या माध्यमातून उतरलेला आहे. त्याचबरोबर महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत रोजगाराची संख्या वाढविण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये 19 लाख 66 हजार दिवस एवढा रोजगार देण्यात आलेला आहे. यासाठी 7101 कोटी रुपयांची रक्कम उपलब्ध करण्यात आले आहे.