पिंपरी चिंचवड शहरातील फेरीवाले म्हणजे असून अडचण नसून खोळंबा झाले आहेत. नागरिकांना घराजवळ स्वस्तात भाजी मिळते. भाजी खरेदीसाठी लांब असलेल्या मंडईत जावे लागत नाही. मात्र सध्या फेरीवाल्यांच्या भोंग्यांचा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे. तसेच बेशिस्तपणामुळे वाहतूक कोंडी होते. पदपथावरून चालता येत नाही, अशा तक्रारी जरी असल्या तरी हॉटेलपेक्षा स्वस्त आणि अनेकदा हॉटेलपेक्षाही चविष्ट पदार्थही याच हातगाड्यांवर मिळतात. तसेच अनेक सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या बजेटमध्ये दैनंदिन खरेदी फेरीवाल्यांमुळेच शक्य होत असल्याचे सत्य नाकारता येऊ शकत नाही.
पिंपरी चिंचवड शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. यामुळे शहरातील पदपथ मोठे आणि सुशोभित होऊ लागले आहेत. मात्र या पदपथावर पूर्वीपासून व्यवसाय करणाऱ्यांची अडचण काही जणांना होऊ लागली आहे. फेरीवाल्यांमुळे रस्ते आडून वाहतूक कोंडी होते. पदपथावर अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना चालता येत नाही, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. यामुळे फेरीवाल्यांचे हॉकर्स झोनमध्ये पुनर्वसन करा, अशी नागरिकांची मागणी आहे. फेरीवाल्यांनी देखील आमचे आहे त्याच जागेवर किंवा हॉकर्स झोनमध्ये पुनर्वसन करावे, अशी मागणी केली. महापालिकेने पूर्वी हॉकर्स झोनसाठी 246 जागा निश्चित केल्या होत्या. मात्र त्याठिकाणी फेरीवाल्यांसाठी पांढरे पट्टे मारून दिले नाही, पाण्याची व स्वच्छता गृहाची सुविधाही दिली नाही. त्यामुळे या 246 पैकी एकाही जागेवरही हॉकर्स झोन झाला नाही. सध्या शहरात ज्या सात-आठ ठिकाणी हॉकर्स झोन झाले आहेत. ते सर्व विशेष बाब म्हणून झाले आहेत. यापैकी निगडीतील भक्ती-शक्ती उद्यानाजवळ दोन, कै. मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली एक, चिंचवड स्टेशन, चिंचवडगाव भाजी मंडई, घरकूल-चिखली आणि सांगवी येथे फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न महापालिकेने केला.
मंडईचा प्रयोगही फेल
महापालिकेने शहरात 32 मंडई बांधल्या आहेत. त्यापैकी 14 मंडई सुरू असून उर्वरित ठिकाणी विक्रेत्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याने धूळखात पडून आहेत. महापालिकेने हॉकर्स झोन 246 ठिकाणे निश्चित केली होती. मात्र स्थापत्य विभागाने या जागेवर साधे पांढरे पट्टे मारूनही दिले नाहीत. त्यामुळे कोणत्या जागेवर कोणी बसायचे याचे नियोजनच झाले नाही. त्यामुळे महापालिकेने निश्चित केलेल्या जागेवर फेरीवाले गेलेच नाहीत. सध्या ज्या ठिकाणी हॉकर्स झाले आहेत त्या विशेष बाब म्हणून झाल्या आहेत. त्या नियोजित 246 जागांचा यामध्ये समावेश नाही.
दुकानदारांकडूनही रस्त्यावर अतिक्रमण
फक्त फेरीवालेच नाहीत तर शहरातील काही दुकानदार पदपथ आणि रस्त्यावर अतिक्रमण करीत आहेत. शहरातील काही भागांमध्ये दुकानदारच आपल्या दुकानासमोरील जागेवर फेरीवाल्याला गाडी लावण्यास जागा देतो. जागा महापालिकेची असली तरी तो दुकानदार फेरीवाल्याकडून भाडे घेतो.
कोविड काळात महत्त्वपूर्ण भूमिका
कोविड काळात मंडई जाणेही नागरिकांना भीतीदायक वाटत होते. कारण गर्दीत कोण करोनाबाधित असेल हे सांगता येत नव्हते. अशावेळी गल्लीमध्ये येऊन भाजी विक्रेता करणारा फेरीवाला देवदूत वाटत होता. तिथेही संसर्गाची भीती नागरिकांना वाटत होती. मात्र मंडईच्या तुलनेत कमी संसर्ग होण्याची शक्यता होती.
महापालिकेकडून कारवाईचा दिखावा कशाला?
महापालिकेकडून शहरातील हातगाड्यांवर कारवाई केली जाते. या हातगाड्या महापालिकेच्या गोदामात ठेवल्या जातात. ठराविक दंडाची रक्कम भरल्यावर या हातगाड्या सोडल्या जातात. पैशाची जमवाजमव करेपर्यंत अनेकदा चांगल्या हातगाड्या कोणीतरी दुसराच व्यक्ती घेऊन जातो. महापालिकेने हातगाड्यांवर कारवाई करू नये. आणि कारवाई केलीच तर परत हातगाड्या देऊ नयेत, अशीही भूमिका काही नागरिकांनी मांडली.
फेरीावाल्यांमुळे होणारे फायदे
घराजवळ सोसायटीच्या बाहेर भाजी आणि साहित्य उपलब्ध होते
मॉल आणि दुकानांपेक्षा स्वस्तात साहित्य उपलब्ध होते
हातगाडीवरील पदार्थ अनेकदा मोठ्या हॉटेल्सपेक्षाही चविष्ट असतात
गुन्हे रोखण्यात अनेकदा पोलिसांना फेरीवाल्यांची मदत होते
फेरीवाल्यांमुळे होणारे तोटे
रस्त्यावर हातगाड्या लावल्याने वाहतूक कोंडीही होते
कर्णकर्कश्य ध्वनीक्षेपकामुळे वृद्ध, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना त्रास
व्यवसाय केल्यानंतर अनेकदा कचरा तिथेच टाकतात
पदपथावर अतिक्रमण केल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते
त्या क्लिपमुळे फेरीवाले बदनाम
फेरीवाल्यांच्या ओंगळवाण्या आणि किळसवाण्या काही क्लिप समोर आल्या आहेत. या क्लिप शहरातील नसल्या तरी फेरीवाल्यांबाबत चीड आणणाऱ्या आहेत. त्यापैकी एक क्लिपमध्ये एक फळ आणि भाजी विक्रेता गटाराच्या पाण्यात पाणी धुवून घेत आहेत. दुसऱ्या क्लिमध्ये एक सफरचंद विक्रेता फळाला थुंकी लावत आहे. विशेष म्हणजे करोनाच्या काळातच ही क्लिप आल्यामुळे संतापजनक वातावरण निर्माण झाले होते. तिसऱ्या छायाचित्रात पाणीपुरी विक्रेता जागेवर तांब्यामध्ये लघुशंका करीत आहे.
सर्व्हेक्षणनंतर होणार फेरीवाल्यांचे मतदान
सध्या फेरीवाल्यांचे सर्व्हेक्षण करण्याचे काम सुरू आहे. या सर्व्हेक्षणातून फेरीवाल्याची मतदार यादी तयार करण्यात येईल. या मतदारांची निवडणूक घेण्यात येईल आणि त्यानंतर फेरीवाल्यांचा प्रतिनिधी फेरीवाला पुनर्वसन समितीवर सदस्य म्हणून घेतला जाईल.
फेरीवाल्यांकडून गैरवर्तनाचे प्रकार नगण्य
शहरातील रिक्षाचालकाने महिलेचा विनयभंग केल्याचे गुन्हे दाखल आहेत. एवढेच नाही तर मॉलमध्येही महिलेचा विनयभंग झाल्याचा गुन्हा हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल आहे. मात्र फेरीवाल्याकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा एकही गुन्हा शहरात दाखल नाही, ही जमेची बाजू आहे.
फेरीवाल्याच्या नावाखाली गैरप्रकार
चिंचवडगावातील लिंक रोडवर ठराविक अंतरावर सायंकाळी तीन पाणीपुरीवाले आपला ठेला लावतात. त्या तीनही ठेल्यांच्या मालक एकच आहे. तो गावाहून तरुणांना आणून या ठेल्यावर बसवतो आणि त्यांच्याकडून दरमहा रक्कमही घेतो. काही काळानंतर धंद्याचे गणित समल्यावर गावाहून आलेले तरुण इतरत्र स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. अशाच प्रकारे अनेक ठिकाणी एकच व्यावसायिक अनेक ठिकाणी फेरीवाले निर्माण करुन व्यवसाय चालवित असल्याचे देखील पुढे आले आहे. चिंचवडमध्ये एकाच व्यक्तीच्या 20हून अधिक हातगाड्या आहेत. त्यांना विशिष्ट रंग दिला आहे. या हातगाड्या भाड्याने दिल्या जातात. ठराविक रंगामुळे महापालिकेचे अधिकारी त्या हातगाड्यांवर कारवाई करीत नसल्याचे बोलले जाते.
नगरसेवकांच्या इशाऱ्यावर कारवाई
शहरातील काही नगरसेवकांच्या आशीर्वादाने खासगी चौपाट्या सुरू झाल्या आहेत. येथील चौपाट्यांवरील फेरीवाल्यांकडून दरमहा ठराविक रक्कम घेतली जाते. अशाच प्रकारे शेतकरी ते ग्राहकाच्या नावाखाली आठवडे बाजार सुरू केले आहेत. त्या चौपट्या आणि आठवडे बाजाराचा धंदा व्हावा, यासाठी नगरसेवक इतर हातगाड्यांवर कारवाई करण्यास महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगतात.
फेरीवाल्यांची संघटना म्हणते…
“”ज्याप्रमाणे शहरात शाळा, उद्याने, क्रीडांगणे, पार्किंग, विरंगुळा केंद्र किंवा इतर कामांसाठी विकास आराखड्यात जागा आरक्षित असतात. तशा फेरीवाल्याच्या हॉकर्स झोनसाठीही जागा आरक्षित केल्या पाहिजे. कारण गावाचे शहर झाले. ज्याप्रमाणे या शहराच्या विकासात कष्टकरी कामगारांचे योगदान आहे तसेच फेरीवाल्यांचेही योगदान महत्वपूर्ण आहे. फेरीवाले अल्पदरात साहित्य पुरवितो. अर्बन स्ट्रीट झाल्यावर फेरीवाल्यांची अडचण होऊ लागली आहे. 2014च्या पथविक्रेता कायद्याची महापालिकेने अंमलबजावणी केली तर कुणालाच काही मागण्याची गरज राहणार नाही. महापालिकेचे भांडवलशाही धोरण असल्याने फेरीवाल्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे.”
काशिनाथ नखाते, अध्यक्ष-महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ
पोलीस म्हणतात…
“”फेरीवाले, पथारीवाले, फूड कॉर्नर मुख्य रस्त्यावर दिसतात. पण त्यांना तिथे थांबता येणार नाही. रस्त्यावर पहिला अधिकार हा पादचारी नागरिकांचा आहे. त्यानंतर वाहनांचा आहे. फेरीवाले, पथारीवाले आणि फूड कॉर्नर अंतर्गत रस्त्यांवर नागरिकांना, वाहनांना अडथळा होणार नाही, अशा ठिकाणी असावेत. याबाबत पोलीस कारवाई करणार आहेत. पोलीस रस्त्यावर उतरणार आहेत. बेशिस्त वाहतूक आणि अन्य समस्यांबाबत अभियान राबवले जाणार आहे.”
डॉ. संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस आयुक्त
महापालिका म्हणते…
राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी फेरीवाल्यांच्या संघटनांनीही सकारात्मक भूमिका घ्यायला हवी. आरक्षणात फेरीवाल्यांसाठी आरक्षण नाही. मात्र महापालिकेकडे ज्या आरक्षित जागा आहेत ज्या लवकर विकसित होणार नाही, अशा ठिकाणी फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याचा महापालिकेचा मनोदय आहे. फेरीवाल्यांमध्ये स्थिर आणि फिरते असे दोन प्रकार आहेत. त्यामुळे हातगाडीवाल्यांनी फिरून व्यवसाय करणे अपेक्षित आहे. दुसरीकडे जागा दिल्यास आपला व्यवसाय होईल का नाही, अशी भीती फेरीवाल्यांना असते. ‘
-प्रशांत जोशी, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
लोकसंख्या वाढत चालली असून फेरीवाला ही सर्वांचीच गरज बनत चालली आहे. फेरीवाले आता आपल्या जिवनाचा अविभाज्य भाग बनत चालले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्यांना जागा उपलब्ध करून दिली पाहिजे.
– राजश्री जायभाय
ज्याप्रमाणे फेरीवाल्यांना धंदा करण्याचे स्वातंत्र्य कायद्यामध्ये दिले आहेत त्याच प्रमाणे नागरिकांनाही रस्ता किंवा पदपथावर विना अडथळा चालता येण्याचे स्वातंत्र्य आहे. फेरीवाल्यांना धार्मिक स्थळ, दवाखाने, शाळा यापासून 100 ते 150 मीटर अंतर दूर ठेवणे गरजेचे आहे.
– ऍड. दत्तात्रय फडतरे
परदेशात रस्त्यावर अथवा पदपथावर कुठेही फेरीवाले दिसत नाहीत. हॉकर्स झोनमध्येच त्यांचे पुनर्वसन केले आहे. त्यामुळे तेथील रस्तेही स्वच्छ असतात. यामुळे हॉकर्स झोन निर्माण करणे हाच यावरील उपाय आहे.
– डॉ. माया माईनकर
वाकडमधील छत्रपती चौक ते उत्कर्ष दरम्यान महापालिकेने सुंदर पदपथ तयार केला आहे. मात्र फेरीवाल्यांनी त्यावर हातगाड्या लावून त्याचे विद्रुपीकरण केले आहे. नगरसेवकाच्या सांगण्यावरून हातगाड्यांच्या परवान्यांचे वाटप करायला नको.
– – एस. मोरे
फेरीवाल्यांमुळे अनेकांची सोय होते हे अगदी खरे आहे. मात्र त्यांनी आपल्या मर्यादा ओलांडल्या की ते डोकेदुखी ठरतात. रस्त्यात हातगाडी उभी करून कर्णकर्कश्य भोंग्याद्वारे ते ओरडतात. याचा त्रास विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्ण यांना होतो.
– समृद्धी मोरे
फेरीवाल्यांमुळे हॉटेलमधील दरांवर नियंत्रण राहत आहे. फेरीवाल्यांचे अन्न चांगले नसते असे म्हणणाऱ्यांनी हॉटेलच्या भटारखान्यात जाऊन पाहावे. तसेच अनेक गुन्हे हे फेरीवाल्यांमुळे टळले आहेत, हे देखील विसरून चालणार नाही.,
– सौदागर शिंदे
फेरीवाल्यांकडे दैनंदिन गरजा भागविणारा घटक म्हणून पाहिल्यास 50 टक्के समस्या दूर होईल. फेरीवाल्यांना खर्च कमी असल्याने त्यांच्या वस्तूही कमी किंमतीत मिळतात. यामुळे ग्राहक आणि फेरीवाले या दोघांचाही फायदा होतो. जागेवरच वस्तू मिळाल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल.
– भास्कर रिकामे
सर्वसामान्य नागरिकांपासून कामगारापर्यंत सर्वांसाठी फेरीवाला हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. सहज रस्त्याच्या कडेला उपलब्ध होणाऱ्या वस्तू स्वस्तात या फेरीवाल्याकडून मिळत असतात. त्यामुळे महापालिकेने फेरीवाल्यास जागा उपलब्ध करून द्यावी.
– इरफान चौधरी
यापूर्वीही पिंपरी-चिंचवड महापालिकने सर्वेक्षण केले होते. तसेच त्यावेळी देखील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याचे निश्चित केले होते. आता फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू आहे, पण पूर्वीच्या फेरीवाल्यांचे पुनवर्सन करावे आणि मगच नवीन सर्वेक्षण करावे.
– अनिल कारेकर
श्रीमंत व्यक्तींच्या गाडीला पिंपरी-चिंचवड महापालिका रस्त्यावर “पे ऍन्ड पार्क’साठी जागा देते. मग फेरीवाल्यांसाठी रस्त्यावर जागा का नाही. महापालिका हा भेदभाव करीत असून “पे ऍन्ड पार्क’ सोबत फेरीवाल्यांना रस्त्यावरच हॉकर्स झोन हवा आहे.
-उमेश डोर्ले
पूर्वी फेरीवाल्यांची संख्या कमी होती त्यावेळी ते सोय होते. आता फेरीवाले हे समस्या झाले आहेत. आपली हातगाडी दिसावी यासाठी ते रस्त्यावर पुढे लावतात. यामुळे वाहतूक कोंडी होते. तसेच वर्क फ्राम होम असताना त्यांच्या भोग्यांचाही त्रास होतो.
– सुरज पवार
फेरीवाल्यांकडील माल स्वस्त असतो. त्यात घासाघीसही करता येते. मात्र त्यामुळे नागरिकांनी पदपथावरील आपला हक्क गमावला आहे. मात्र फेरीवाल्याच्या वाढत्या संख्येमुळे हे प्रकरण महापालिकेच्या हाताबाहेर गेल्याचे दिसून येत आहे.
– विशाखा नागोसे
रोजगार नसल्याने नागरिक रस्त्यावर छोटे व्यवसाय करीत असतात. फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोनमध्ये जागा उपलब्ध करून दिल्यास त्यांना हक्काची जागा मिळेल. तसेच दुकानदार आणि फेरीवाल्यांमध्ये होणारे वादही टळतील.
– मनिषा खेडकर
शहरातील मुख्य परिसरात महापालिकेने हॉकर्स झोन निर्माण करावेत. मात्र फेरीवाल्यांचा परवाना दरवर्षी नूतनीकरण करावा. फेरीवाल्यांमुळे रहदारीवर ताण येऊ नये तसेच शहराचेही विद्रुपीकरण होता काम नये.
– संजय मोरे
काही फेरीवाल्यांचे मालक वेगळेच असतात. त्यांचे पुनर्वसन करणे म्हणजे दुसरे फेरीवाले जन्माला घालणे होय. खरंतर गरजवंताला हातगाडी लावता येत नाही. फेरीवाल्यांना वेळीच पायबंद घालून शहराचे सौंदर्य जपावे.
– गणेश घाटे
चौकात अगदी कॉर्नरला फेरीवाले हातगाड्या लावतात. येथे येणारे ग्राहक हातगाडीसमोरच आपली दुचाकी उभी करतात. यामुळे चौकातील वाहतूक कोंडीला फेरीवालेच जबाबदार असतात. यामुळे फेरीवाल्यांना चौकात जागा न देता वेगळ्या ठिकाणी जागा द्यावी
– रामदास टिळेकर
कामावर जाण्याची घाई असते अशावेळी भाजी घेऊन आलेला फेरीवाला हा देवदूतासारखाच असतो. फेरीवाल्यांमुळे वाहतूकीची कोंडी होत असल्यास त्यांना वेळ आणि जागा निश्चित करून दिल्यास त्यांची समस्या निर्माण होणार नाही.
– स्वाती भिसे
यांच्याही प्रतिक्रिया उल्लेखनीय आहेत
विकास गर्ग, यशवंत चासकर, राजन पाटणे, सां. रा. वाठरकर, आनंदा कुदळे,
रमेश पाटील, श्रीकृष्ण भोसले, मनिषा परांडे, प्रमोद येवले, मंगेश पाटील, विशाल गडगे, राजू भालेराव, भावना क्षीरसागर, भाग्यदेव घुले, विलास पाडळे, अनिता धाक्रस, यशवंत कन्हेरे, राजकुमार शेडगे, विठ्ठल कळसे, सनी गवई.